पुणे – देशात परिवर्तनाचे वातावरण आहे, पंतप्रधान मोदी यांना पराभव दिसू लागल्यानेच ते शहीद जवानांच्या नावावर पक्षाला मते मागतात आणि देशासाठी शहीद झालेल्या स्व. हेमंत करकरे यांच्या नावाने, भाजपतर्फे उमेदवारी जाहीर
झालेल्या प्रज्ञा ठाकूर अपमानास्पद भाष्य करतात. अशा दुटप्पी लोकांच्या हाती सत्ता देणार काय असा सवाल पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी घोरपडीतील कोपरा सभेत केला.
पुणे लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी घोरपडीतील जय हिंद चौकात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक अविनाश
बागवे, साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत कवडे, संजय कवडे, माजी नगरसेविका पार्वतीताई भडके, पूनम बोराटे, सुरेखा कवडे, हर्षद बोराटे, हाजी नासीरभाई, कॅन्टोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे शहरातील पाण्याच्या नियोजनाबरोबरच तुरडाळ भ्रष्टाचार, यांचा आढावा घेऊन बागवे म्हणाले की, भारताचे संविधान बदलण्याचा घाट भाजपच्या मंडळींनी घातला आहे. केवळ आश्वासने द्यायची, भूलथापा सांगायच्या प्रत्यक्षात
कृती शून्य आणि जाहिरात बाजी मात्र हजारो कोटी रुपयांची अशी तऱ्हा असल्याचे सांगून ते म्हणाले की, पुलवाम्यातील शहीद जवानांसाठी द्यायला यांना पैसे नाहीत पण जाहिरातींवर, मोदींच्या परदेश दौऱ्यावर खर्च करायला यांना हजारो
कोटी आहेत. सामान्य गरीब माणसांच्या तोंडातला घास हिसकावणाऱ्यांना येत्या २३ तारखेला धडा शिकवायची संधी आली असून मोहन जोशींना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नगरसेवक अविनाश बागवे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील मंत्री असलेल्या लोक प्रतिनिधीवर उच्च न्यायालय गुन्हा दाखल करण्याचे आदेश देते पण राज्यसरकार व गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री त्याकडे जाणीवपूर्वक काना डोळा
करतात. गेल्या पाच वर्षामध्ये झालेली चूक सुधारण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्याच मोहन जोशी यांना मतदान करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल, वाहतूक कोंडी आणि महापालिकेशी संबंधित अन्य प्रश्नांसाठी
आपण प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले.
ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर संजय कवडे, हाजी नासीरभाई, विठ्ठलराव थोरात आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर परशुराम बुलबुले, अक्षय राजुरे, अजय गणेशकर, अविनाश कवडे, क्लेमंट लाझरस, विल्सन रेड्डी, रतन तडके, राजेश गायकवाड, संजय कन्नान, शाहिद शेख, अबू बकर, प्रकाश कवडे, श्रीमती शलाका मुरुड आदी उपस्थित होते.