पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. ज्या उदात्त हेतूने डॉक्टर आंबेडकर
यांनी देशाची घटना लिहीली या घटनेतील मूल्यांना भाजपने गेल्या पाच वर्षात तिलांजली दिली
आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांनी
केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले त्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी अरविंद शिंदे, अविनाश
बागवे, रजनी त्रिभुवन, लताताई राजगुरु, सुजीत यादव, राहुल तायडे आदि उपस्थित होते.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचा आणि त्यांच्या तत्त्वांचा इतका अवमान या
देशात यापूर्वी कधीही झाला नव्हता भाजपने केवळ तोंडदेखलेपणासाठीच डॉ. आंबेडकरांच्या नावाचा
वापर केला. प्रत्यक्षात देशातल्या दलित बांधवांवर गेल्या पाच वर्षात भीषण अत्याचार झाले
आहेत. या साऱ्या गोष्टींचा जाब जनता विचारत असून भाजपला त्याचे उत्तर द्यावे लागेल. या
निवडणुकीत त्याची जबर किंमत भाजपला मोजावी लागेल असेही मोहन जोशी यांनी यावेळी
नमूद केले. जोशी यांनी आज दिवसभर शहरातील विविध भागात नागरिकांशी संपर्क साधला.
तसेच ठिकठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली
वाहिली. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपकक्ष हेच डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी
आहेत असे ते म्हणाले.
कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज
सकाळी तळजाई टेकडी येथे जाऊन सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली.
त्यावेळी बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रियाताई सुळे यांनी देखील
मतदारांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर मोहन जोशी यांनी क्रिकेट चा आनंद लुटला.
नगरसेवक आबा बागुल यांनी केलेल्या गोलंदाजीवर त्यांनी चौकार मारून प्रेक्षकांच्या टाळ्या
मिळवल्या. त्यानंतर पद्मावती येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत नगरसेवक आबा
बागुल, सुभाष जगताप, अमित बागुल व अन्य प्रमुख कार्यकर्ते होते.