पुणे-‘ अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून काम करताना गिरीश बापट यांच्यावर सुमारे अडीचशे कोटींचा तूर-डाळ विक्रीसंबधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. गिरीश बापट हे आता भाजपतर्फे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे आपल्यावरील झालेल्या आरोपांबाबत त्यांनी पुण्यातील जनतेला उत्तर द्यावे” असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार शरद रणपिसे यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना केले. याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी आमदार जयदेव गायकवाड तसेच प्रदेश काँग्रेसचे मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष गौतम आरकडे आदी उपस्थित होते.
आमदार शरद रणपिसे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. तूर-डाळ घोटाळा, चिक्कीघोटाळा अशी त्यापैकी अनेक उदाहरणे आहेत. त्याबाबत आम्ही विरोधी पक्षांनी अनेकवेळा विधिमंडळ सभागृहात प्रश्न उपस्थित केले मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना स्वतःच न्यायाधीश असल्याप्रमाणे क्लीनचिट दिली. मात्र एक नैतिकता म्हणून तूर-डाळ घोटाळ्याबाबत आपल्यावरील झालेल्या आरोपांबाबत गिरीश बापट यांनी पुण्यातील जनतेला उत्तर द्यावे असे त्यांनी आवाहन केले.
मोदी सरकारवर टीका करताना शरद रणपिसे म्हणाले, ‘मैं नही खाऊंगा, ना किसीको खाने दूंगा’ अशा मोठ्या घोषणा देत मोदी सरकार सत्तेवर आले परंतु राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यावरून मोदी सरकार भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले आहे. राफेल-प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर का देत नाहीत असा सवालही रणपिसे यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला अतिशय अनुकूल वातावरण आहे असे सांगताना आ. रणपिसे यांनी गुरुवारी झालेल्या विदर्भातील पहिल्या फेरीतील मतदान लक्षात घेता विदर्भातील काँग्रेस आघाडीचे बहुसंख्य उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, मोदी सरकारच्या राजवटीत दलित, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक जमातींवर अत्याचारच झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना बदलण्याचेही प्रयत्न झाले. त्यामुळे समाजातील सर्वच घटक असंतुष्ट आहेत. जनतेच्या मनातील या असंतोषाचे सुप्त दर्शन लोकसभा निवडणुकीतील प्रचारात दिसून येत आहे. त्यामुळे सरकारविरोधी वातावरणाची परिणीती निश्चितच भाजपच्या पराभवात होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले.