पुणे-पुणे व मालाड, मुंबई येथे भिंत कोसळून अनेक जणांचे बळी गेले. केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रती लिटर २.५ रूपयांची वाढ झाली आहे. राज्यात खरीपाचा हंगाम सुरू असून अद्यापही बँकानी पुरेशा प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले नाही. या सर्व विषयांमध्ये सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.
आपल्या भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘मागील ५ वर्षांपासून भाजप – शिवसेनेच्या राजवटीत भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे. विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे आणि आर.टी.आय. कार्यकर्त्यांनी अनेकदा भ्रष्टाचार संदंर्भात ठोस पुरावे समोर आणले आहे. असे असताना सुध्दा सरकारने नेहमी भ्रष्टाचाराला क्लिनचिट देण्याची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात भिंत कोसळून अनेक गरीब मजूर मरण पावले. या दुर्घटनेला कारणीभूत असलेले बांधकाम व्यावसायिक, अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची गरज आहे. या सर्वांच्या संगनमताने अशा घटना घडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. आणि ४ जण बेपत्ता आहेत. त्यापूर्वी या धरणाची डागडुगी करण्यात आली तरी सुध्दा ही घटना घडली ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेस दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकार कमालीची निष्क्रियता दाखवित आहे. राज्यात खरीप हंगाम सुरू असताना बँकांनी शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले नाही अशी तक्रार अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे. सर्व बँकांकडून एन.ओ.सी. आणावी यासाठी बँकांनी शेतकऱ्यांची अक्षरश: अडवणूक सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावण्यात आला आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांवर व सामान्य नागरिकांवर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’
यानंतर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना भेटून निवेदन सादर केले.यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, दत्ता बहिरट, संगिता तिवारी, सोनाली मारणे, सचिन तावरे, विशाल मलके, भुषण रानभरे, शेखर कपोते, भगवान धूमाळ, वाल्मिक जगताप, ज्ञानेश्र्वर मोझे, प्रविण करपे, सुजित यादव, सेल्वराज ॲन्थोनी, साहिल केदारी, राजेंद्र शिरसाट, उस्मान तांबोळी, राजेंद्र मगर, मुन्नाभाई शेख, राजू साठे, लुकस नायडू, विनय ढेरे, नंदा ढावरे, मीरा शिंदे, रजिया बल्लारी, ज्योती अरवेन, मिसाबा शेख, छाया जाधव, ललिता जगताप आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .