पुणे -आम्ही राबवीत असलेल्या योजना जुन्याच आहेत पण पूर्वी त्यांचे निव्वळ राजकारण केले गेले . आता आम्ही त्याच योजना प्रत्यक्षात जनतेसाठी साकार करतो आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर आम्ही वेळीच लक्ष दिले नाहीतर भविष्यामध्ये पुण्याची ओळख प्रदूषित शहर म्हणून होईल, अशी शक्यता व्यक्त केली.
स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर, आॅफिस राइड, बाणेर येथील स्मार्ट रस्ते पुनर्रचना, प्लेसमेकिंग साइट, स्मार्ट स्कूल्स आणि सायन्स पार्क अशा तब्बल सात प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले , शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. या विस्तारीकरणामुळेच मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्याही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पुण्यात वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच येथे प्रदुषणाची समस्या निर्माण होऊ लागली आहे. परिणामीशहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आणि भविष्यात प्रदूषित शहर ही ओळख मिळण्यापूर्वीच प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज असून नागरिकांना चांगल्या सुविधा द्यावी. अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.
तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून पुण्यात मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती असून दिलेल्या वेळेपूर्वी नागरिकांच्या सेवेत असणार असल्याचे त्यांनी सांगितले
पीएमपीच्या ताफ्यात आता 25 ई- बस दाखल झाल्या असून या बसेसचा लाेकार्पण साेहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या या बसेस असून यामुळे प्रदूषणात घट हाेणार आहे. तसेच या सर्व बसेस एसी असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर हाेणार आहे.
पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूकीसाठी पीएमपीकडून ई- बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत 150 बसेस खरेदी करण्यात येणार असून त्यापैकी 25 बसेस पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण एसी असणाऱ्या या बसेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये पॅनिक बटण असून आपत्कालिन वेळी नागरिकांना त्याचा वापर करता येणार आहे. बसेसला जीपीएस यंत्रणा असून स्वयंचलित दरवाजे आहेत. त्याचबराेबर या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा सुद्धा लावण्यात आले आहेत. तीन तास बस चार्ज केल्यानंतर ती 200 किलाेमीटर धावू शकणार आहे. सध्या निकडी आणि भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत.