बीव्हीजी व डिक्की शेतकरी उद्योजक घडवणार : मिलिंद कांबळे
पुणे :
बीव्हीजी उद्योग समुह व दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डीक्की) आगामी काळात शेतकरी उद्योजक उभारणार असल्याचे प्रतिपादन डीक्कीचे अध्यक्ष श्री. मिलिंद कांबळे यांनी केले.
बीव्हीजी लाईफ सायन्सेसतर्फे आयोजित केलेल्या खरीप नियोजन शेतकरी मेळाव्यात श्री. कांबळे बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड, हास्य क्लबचे श्री. मकरंद टिल्लू, विश्वशांती इंटरनॅशनल फाऊंडेशनचे डॉ. दत्ता कोहीनकर, श्री. वसंत हणकारे, श्री. प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. कांबळे म्हणाले की, विषमुक्त शेतमाल विक्रीची बाजारपेठ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशी बाजारपेठेत भारतीय विषमुक्त शेतमालास मोठी मागणी आहे. मात्र, त्याचवेळी रासायनिक शेतीमध्ये अतिरिक्त उत्पादनाचा अट्टाहास टाळून उत्पादित केलेल्या शेतमालास देशांतर्गत बाजारपेठ मिळवून देणेही तितकेच महत्वाचे आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कमी खर्चात बीव्हीजी लाईफ सायन्सेसने आश्वासक चळवळ उभी केली आहे. श्री. हणमंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बीव्हीजी शेतीच्या क्षेत्रातही नक्कीच मोठा पल्ला गाठणार आहे. सध्याच्या हवामान बदलाच्या काळात बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने शेतकरी टिकवला आहे.
यावेळी बोलताना श्री. गायकवाड म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, आता शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे आहे. शेतीवरचा खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहेत. हे शेतीसाठी व मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. म्हणून सर्वांनी विषमुक्त शेतीस प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांनी प्रथम माती व पाणी परिक्षण करुन घ्यावे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल. यापुढे प्रत्येक शेतकरी व नागरिकाने विषमुक्त शेतीसाठी प्रचार व प्रसाराबरोबर प्रत्यक्ष अनुकरण करावे. सध्या वाढलेले दुर्घर आजार हे आहारातून होत आहेत. म्हणून आता पुन्हा सेंद्रीय उत्पादन अर्थात विषमुक्त शेतीकडेच वळले पाहिजे. तरुणांना बाहेरच्या देशात नोकरी व व्यवसायासाठी मोठी संधी आहेत. प्रत्येकाकडे एक वेगळे कौशल्य आहे. त्याचा वापर करा. कौशल्य आधारित शिक्षण घेत व्यवसाय करा. यश नक्की मिळेलच संघर्ष जीवनाला घडवत असून भारत निर्माण कंपनी ही शेती, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रात मोठे काम करत आहे. नव्याने अनेक योजना राबवून देतांना सुमारे दहा कोटी जनतेच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा मनोदय असल्याचेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे संचालक श्री. गणेश लिमये यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता पोफळे यांनी केले.