पुणे: “ज्यांच्या तीन पिढ्या गेली ७० वर्षे केवळ ‘गरीबी हटाओ’चा नारा देत आहेत. त्यांनी विकासाची खोटी स्वप्न जनतेला दाखवू नयेत. देशाला शाश्वत विकासाची गरज असताना वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही जे देशातील गरीबी हटवू शकले नाहीत ते काय विकास करणार?” असा सवाल उपस्थित करत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेसच्या ‘गरीबी हटाओ’ घोषणेचा खरपूस समाचार घेतला.
सावित्रीबाई फुले स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा व मातंग समाज कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक गोपाळ चिंतल, स्वाती लोखंडे, हनुमंत साठे, अशोक लोखंडे, श्रीधर कसबेकर, सुषमा कांबळे, विकासभाऊ सातारकर, सुखदेव आढागळे उपस्थित होते.
बापट म्हणाले की, काँग्रेसच्या फसव्या धोरणांमुळे क्षमता असूनही देशाची प्रगती झाली नाही. निवडणूक आली की, काँग्रेस पक्षाला गरीब आठवतात. काँग्रेस गेली ५० वर्ष सत्तेत होती. तरी त्यांना गरिबांना न्याय देता आला नाही. याउलट मोदींनी गरिबांसाठी अनेक योजना आणल्या. यामध्ये पंतप्रधान आवास, उज्वला गॅस, आयुष्यमान भारत यासारख्या योजना आणून गरिबांच्या आयुष्यात नवचैतन्य आणले.
ते पुढे म्हणाले की, गरीब, मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेऊन विधायक योजना आम्ही राबवल्याने खऱ्या अर्थाने अच्छे दिन आता आले आहेत. झोपडपट्टी पुर्नवसन योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो लोकांना पक्की घरे मिळत आहे.
आज पुण्यात अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये पैसे वाढवून देऊन त्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा आमचा भविष्यात प्रयत्न असणार आहे. त्याच प्रमाणे लहुजी वस्ताद यांचे ही भव्य स्मारक उभा करण्यासाठी भविष्यात आम्ही प्रयत्नशील असणार आहे. सरकार आपल्या दारी घेऊन येऊन तुम्हाला मदत करायची हा विचार घेऊन ही निवडणूक मी लढवत आहे. असे मत मी यावेळी व्यक्त केले.
भाजपने मागासवर्गीय समाजाला संधी दिली : कांबळे
स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे म्हणाले, भारतीय जनता पक्षावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. मात्र भारतीय जनता पक्षाने अनेक मागासवर्गीय समाजातील लोकांना संधी देऊन नेतृत्वाची संधी दिली आहे. पुणे शहरा पुरता विचार करायचा झाल्यास मातंग समाजातील 11 नगरसेवक निवडून आले आहेत.भारतीय जनता पक्ष जातपात न बघता सर्वसमावेशक विकास करतो त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता विकासाठी भाजपाला मत देण्याचे आवाहनही त्यांनी यांवेळी केले.