पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना पुणेकर बुडवितील पाण्यात -गिरीश बापट
पुणे-मतदान झाल्यानंतर भाजप पुण्याच्या पाण्यात कपात सुरु करेल अशी भीती व्यक्त करणाऱ्या कॉंग्रेसला ‘ पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना पुणेकर पाण्यात बुडवीतील असा टोला लगावत पुण्याचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे पुणेकर नागरिकांना शुद्ध, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.
बापट यांच्या प्रचारार्थ पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार फेरीच्या समारोप प्रसंगी श्री. बापट बोलत होते. अप्पर इंदिरा नगर येथे पदयात्रेला प्रारंभ झाला. लोअर इंदिरा नगर, संभाजी नगर, तीन हत्ती चौक, सहकार नगर, अरण्येश्वर मंदीर, लक्ष्मीनगर, गजानन महाराज चौक परिसरमार्गे पर्वती दर्शन येथे समारोप झाला.
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. कॉंग‘ेसच्या कार्यकाळात पाणीपुरवठ्याचेही राजकारण करण्यात आले. महायुतीने गेल्या पाच वर्षांत पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले. बहुचर्चित व प्रलंबित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली आहे. धरण साठ्यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपणार आहे. भामा-आसखेड प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होईल. त्यामुळे नगर रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पर्वती येथे २५० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि पर्वती ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसराचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.’
आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेवक बाळा ओसवाल, राजू शिळीमकर, राजश्री शिळीमकर, वर्षा साठे, रूपाली धाडवे, महेश वाबळे, साईदिशा माने, महेश लडकत, धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, अशोक हरणावळ, अर्जुन जानगवळी, सूरज लोखंडे, श्रीकांत पुजारी, हरिष परदेशी आदी मान्यवर सहभागी झाले होते.