कलेमध्ये सफलता नव्हे तर सार्थकता महत्वाची: वाजपेयी
पं. रोहिणी भाटे यांच्या ‘लहजा’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन
पुणे ; कलाकाराचे मोठेपण हे त्याच्या यशावर ठरवू नये. परंतु, दुर्देवाने सध्या असाच पायंडा पडत आहे. कलेमध्ये सफलता नव्हे तर सार्थकता महत्वाची आहे, ही सार्थकता रोहिणीताईंनी आपल्या अथक मेहनतीने प्राप्त केली होती असे गौरवोद्गार काढत रझा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनी गुरू पं रोहिणी भाटे यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला.
नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीची ७१ वर्षपूर्ती तसेच कथक सम्राज्ञी पं रोहिणी भाटे यांची १० वी पुण्यतिथी असे दुहेरी औचित्य साधून ‘लहजा’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध नर्तक व लेखक पुरु दधीच, पं. जयंत कस्तुआर, रवी परांजपे आदी मान्यवर देखील उपस्थित होते. गुरू रोहिणी भाटे यांनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नृत्यभारतीच्या ज्येष्ठ शिष्यांनी गणेशस्तुती व ऋतूगान या रोहिणीताईंच्या अजरामर नृत्यरचनांचे सादरीकरण केले.
वाजपेयी म्हणाले की, रोहिणीताईंसारख्या विचारशील नर्तक आणि गुरू कोणीच नाही. त्या अशा एकमेव कलाकार होत्या की ज्या दुसऱ्यासाठी वेळ देऊनही आपला एकांत जपत होत्या. त्यांनी केलेले मनन, चिंतन हे त्यांच्या लेखनातूनही उतरत होते, म्हणूनच त्या कलेतील प्रगल्भता गाठू शकल्या. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इतर कलेविषयी त्यांना नितांत आदर, सन्मान होता. त्याविषयी ग्रहणशीलता, उत्सुकता त्यांना होती. अतिशय सखोल, सूक्ष्म आणि परिपक्व शैलीतून घडलेले ‘लहजा’ हे पुस्तक त्यांच्या शिष्यांसाठी गीता किंवा बायबलप्रमाणे महान ठेव आहे असेही वाजपेयी यांनी सांगितले.
दधीच म्हणाले की, ‘लहजा’च मूळ मराठी पुस्तक मी वाचले होते. त्यावेळीच याचा हिंदी भाषेत अनुवाद व्हावा, व रोहिणीताईंचे विचार सर्वांपर्यत पोहोचावे असे मला वाटले होते ते स्वप्न आज नृत्यभारती व रझा फाऊंडेशनमुळे सत्यात साकारले. पारंपरिक विचारपलीकडे जाऊन एक स्वतंत्र विचार मांडण्याचा प्रयत्न रोहिणीताईंनी केला. त्यांच्यावर कलेचे खरे संस्कार होते, कलेचा दृष्टिकोन होता हे ‘लहजा’ मधून स्पष्ट होते. याचा अनुवादही समर्पक झाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी नीलिमा अध्ये यांनी रचलेल्या रोहिणीताईंवरील काव्यावर उत्स्फूर्त अभिनयरुपी नृत्य करून रोहिणीताईंचे व्यक्तिमत्त्व जयंत कस्तुआर यांनी उलगडले . रसिकांना ही कलाकृती विशेष भावली. कथक प्रेमी, रसिक, शिष्या अशा सर्वांसाठी ‘लहजा’ ही रोहिणीताईंनी दिलेली अनमोल भेट अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर रोहिणीताईंसारख्या महान कलावतीविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही, परंतु, त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मला अतीव आनंद होत आहे, असे सांगत डॉ. मोहन आगाशे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मूळ मराठी पुस्तक ‘लहजा ‘ यातील गुरु रोहिणीताईंच्या शोधनिबंधाच्या हिंदी रूपांतराबरोबरच त्यांचे मूळ हिंदीतूनच लिहिलेले शोधनिबंध व कथक नृत्यासाठी लिहिलेले हिंदी कविता यांचा समावेश आहे. तसेच काही मान्यवरांचे गुरु रोहिणी भाटे यांच्यावरील लेखही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. भाषांतराचे काम स्मिता दाते, नीलिमा अध्ये, सुनीता पुरोहित यांनी केले असल्याची माहिती नीलिमा अध्ये यांनी दिली. सुनीता पुरोहित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रोहिणीताईंवरील ध्वनीचित्रफितीने कार्यक्रमाचा समारोप झाला.
सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत वाजपेयी म्हणाले की, कथक सध्या भरकटलेले व विचारहीन वाटत आहे. भपकेबाजपणात आणि खोट्या लखलखाट कथकचे मूळ सौंदर्य कुठेतरी हरवत चालले का? या संभ्रमात मी आहे. अंधाराला लपविणार हा लखलखाट आपल्याला नको. अशा अंधःकाराला रोहिणी ताईंच्या विचारांचा दीपच प्रकाशमान करू शकतो.