स्वच्छ भारत’ मोहिमेबरोबरच, शंभर खेड्यांचा विकास करण्याचे कंपनीचे नियोजन; पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पुरवठा, अंतर्गत रस्त्यांची बांधणी, शिक्षण व आरोग्य या पाच गोष्टींवर भर.
पुणे- अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रात देशात अग्रगण्य असलेल्या भारत फोर्जने ‘स्वच्छ भारत अभियान’ ही मोहीम पुढे नेण्याचे ठरवून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अपूर्व अशा उपक्रमात एक लाख नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य भारत फोर्ज कंपनी करणार आहे. या कामी कल्याणी समुहाचे कर्मचारी, भारत फोर्जने मदत केलेल्या 25 खेड्यांमधील गावकरी तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक हे सहभागी होणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत, जनजागृती करण्यासाठी आज एका विशेष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेमध्ये भारत फोर्जचे कार्यकारी संचालक अमित कल्याणी, कंपनीचे अन्य वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दादा कोद्रे, तसेच स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड, पूजा कोद्रे, हिमाली नवनाथ कांबळे आणि मंगला मंत्री आदी उपस्थित होते. या पदयात्रेमध्ये कल्याणी समुहातील कर्मचारी आणि परिसरातील नागरीक असे सुमारे 500 जण सहभागी झाले होते.
भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी याप्रसंगी म्हणाले, ‘’स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम देशासाठी फार महत्त्वाचा आहे. आमच्या उद्योगातील एक अग्रणी या नात्याने, भारतातील जे उत्कृष्ट ते जगापुढे आणणे हे आमचे कर्तव्यच ठरते. आपल्या परिसरात सार्वजनिक स्वच्छता कशी व का करावी, हे नागरिकांना समजावून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या मोहिमेमध्ये सहभागी होऊन यापुढेही असेच कार्यक्रम राबवीत 2019 पर्यंत स्वच्छ भारत निर्माण करण्याचे ध्येय गाठण्यासाठी हा उपक्रम राबविताना आम्हाला मोठा अभिमान वाटतो. सामाजिक जबाबदारी उचलणे हे आमच्या उद्योगाचे मूलभूत तत्व असून आमची प्रत्येक कृती त्याच अनुषंगाने होत असते.’ स्वच्छ भारत’ मोहिमेत सामील होणे, हाही याच कृतीचा भाग आहे.’’
परिसराची, शाळांची व गावांची स्वच्छता करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन व स्वच्छ सवयींविषयी घरोघरी जाऊन माहिती देणे आणि पदयात्रांतून जनजागृती करणे अशा तीन प्रकारे भारत फोर्ज कंपनी ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये सहभागी होणार आहे. या उपक्रमांना पुण्यातील सर्व स्तरांतील नागरिकांनी व विविध मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.
सर्व देश स्वच्छ व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या या मोहिमेमध्ये, कल्याणी समूह ‘स्वच्छता ही सेवा’ या नावाने आपले उपक्रम राबविणार आहे. चिरंतन स्वरुपाचा विकास करण्याच्या हेतूने सामाजिक बांधिलकी मानून कल्याणी समूह या राष्ट्रीय मोहिमेत आपले हे योगदान देत आहे.
‘स्वच्छ भारत’ मोहिमेबरोबरच भारत फोर्ज कंपनीने शाळांमध्ये स्वच्छता करण्याचे प्रकल्प आखून 20 शाळांमध्ये कंपनीने स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. या स्वच्छतागृहांची देखरेख करण्याची जबाबदारीही कंपनीने उचलली आहे. सुमारे 5470 विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळत आहे.
महाराष्ट्र सरकार राबवीत असलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानात भारत फोर्ज कंपनी सहभागी झालेली आहे. भारत फोर्जने पुरंदर, आंबेगाव, शेवगाव, पाथर्डी, कोरेगाव, पाटण, पन्हाळा, बारामती अशा तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील जलयुक्त शिवार कामांमध्ये हातभार लावला आहे, 4,30,454 घनमीटर इतका गाळ काढून 443.45 टीसीएम इतक्या पाण्याचा अतिरिक्त साठा निर्माण केला आहे. या कामांमुळे सुमारे 1867.75 एकर जमीन लागवडीखाली आली आहे.
‘भारत फोर्ज’विषयी..
भारत फोर्ज लि. (बीएफएल) ही पुण्यात स्थापित असलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी मेटल फॉर्मिंग क्षेत्रात जगात आघाडीवर आहे. विविध देशांमध्ये तिचे दहा मोठे कारखाने आहेत. वाहन उत्पादन, वीजनिर्मिती, तेल व वायू, बांधकाम, खाणी, रेल्वे, सागरी उद्योग आणि विमानोद्योग या क्षेत्रांना भारत फोर्ज कंपनी आपली उत्पादने व सेवा पुरवते. तीन अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या व जगभरात 10 हजार कर्मचारी संख्या असलेल्या कल्याणी समुहाचा भारत फोर्ज ही एक भाग आहे. या कंपनीकडे धातूशास्त्र या विषयातील सर्वात मोठे ज्ञानभांडार व त्यातील कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उत्पादनाची संकल्पना, त्याचे डिझाईन, त्यातील अभियांत्रिकी, प्रत्यक्ष उत्पादन, चाचण्या व उत्कृष्टतेची हमी अशा विविध पातळ्यांवरील सेवा जगभरात विविध ठिकाणी असलेल्या आपल्या ग्राहकांना भारत फोर्ज कंपनी पूर्ण क्षमतेने देऊ करते.