विधानसभेत आशिष कांटेंसारख्यांची गरज- अर्जुन खोतकर
पुणे- ‘ज्याच्या जीवनाच्या प्रवासात अनेकांनी टाकले होते काटे…त्याला तुडवत पुढे निघाले आहेत, आशिष कांटे… अशी आपल्यानेहमीच्या शैलीत रचना सादर करीत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील ‘तारका फाऊंडेशन’या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिष कांटे यांच्या कार्याचा गौरव केला. आशिष कांटे सारख्या तरुणासाठी आरपीआय तर्फे पुण्यामध्ये एक जागा मागून घेऊ असे रामदास आठवले यांनी सांगितल्यावर, आपण दोघांनी एकत्र हात दिल्यास आशिष कांटे नक्की आगामी विधानसभेत दिसतील अशी जोरकस टिप्पणी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आणि या अभिष्टचिंतन मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा जोरदार रंगली. निमित्त होते युवा नेते आशिष कांटे यांच्या वाढदिवसानिमित्ताच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे!
भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, आरपीआय
अशा सहाही पक्षांचे नेते या वाढदिवसानिमित्त मंचावर एकत्र आल्याचे अनोखे दृश्य या कार्यक्रमात दिसून येत होते. हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती व त्यातून गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक हा देखील चर्चेचा विषय बनला होता. ‘तारका फाऊंडेशन’च्या वतीने आशिष कांटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यातील श्री महालक्ष्मी लॉन्स येथे त्यांच्या अभीष्टचिंतनाचा भव्य मेळावा आणि विशेष पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आठवले बोलत होते. यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार अनिल
शिरोळे, शिपिंग बोर्डचे चेअरमन व माजी खासदार प्रदीप रावत,माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, माजी आमदार मोहन जोशी पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक महेश लडकत, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे-पाठक, सिद्धार्थ शिरोळे, सौ.स्वरदा बापट, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, भाजप संघटनमंत्री रवी अनासपुरे, आरएसएसचे महेश करपे, मनसेचे कामगार सेनेचे मुंबईचे अध्यक्ष मनोज चव्हाण, सह्याद्री क्रीडा मंडळ, मुंबईचे अध्यक्ष व भाजप नेते राहुल वाळुंज, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे व निलेश गिरमे, आरपीआय नेते परशुराम वाडेकर व बाळासाहेब जानराव, राष्ट्रवादीचे माणिकशेठ दुधाणे, आरपीआय महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी निकाळजे आदी उपस्थित होते.
‘सर्वजीव मंगल प्रतिष्ठान’चे डॉ. कल्याण गंगवाल, इस्त्रोचे सॅटेलाईट पॉवर इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन घाटपांडे, महाराष्ट्रात ४० हजाराहून अधिक तरुण तरुणींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारे ‘अस्पायर नॉलेज व स्कील्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, विल्यम साळवी (व्यसनमुक्ती), कासीम इराणी( गुडलग हॉटेल) आणि इतिहास
संशोधक दत्ताजी नलावडे यांना यंदाच्या ‘तारका फौंडेशन सामाजिक कृतज्ञता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तानाजी मालुसरे यांच्या वंशज श्रीमती शीतलताई मालुसरे, मतीमंद मुलांसाठी काम करणारी ‘सावली संस्था’, एड्सग्रस्त पालकांच्या लहान मुलांसाठी काम करणारी ‘मानव्य संस्था’, शिरगाव आश्रमशाळा आणि ‘आपलं घर’ चे विजय पळशीकर यांचा विशेष सामाजिक कार्याबद्दल प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, आर्यन कीर्ती जाधव, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर किरण साठे, मंगेश बालन, बाळासाहेब चौधरी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
आठवले म्हणाले, मला नेहेमीच वारे कळतात. आशिष कांटे हा भविष्यामध्ये फारच मोठा होणार आहे. आशिषकडे भावी आमदार म्हणून बघितले जात आहे. तो कुठल्या पक्षाकडून उभा राहणार आहे हे माहिती नाही. मात्र, त्याची इच्छा असल्यास तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय) मध्ये आला तर त्याला आम्ही उमेदवारी देऊ शकतो. त्याच्यासाठी पुण्यातील आठ जागांपैकी एक जागा आरपीआयला मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
आशिष हा चांगला कार्यकर्ता असून त्याने पोल्ट्री, डेअरी, अशा प्रकारचे ग्रामीण उद्योग करून जीवनात चांगली आर्थिक प्रगती केली आहे. त्याच्याबरोबरीने ‘तारका फाउंडेशन’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आपला उद्योग सांभाळून लोकांची सेवा करणे, रुग्णांना मदत करणे, विद्यार्थ्यांना मदत करणे असे अनेक उपक्रम ते राबवितात. आशिष कांटे हा हाडाचा कार्यकर्ता आणि उद्योगपती आहे असे गौरोद्गार आठवले यांनी काढले.
अर्जुन खोतकर म्हणाले, गेली तीस वर्षे विधानसभेत मी काम करत आहे. मला तरुणांमध्ये राहायला आवडते. आशिष कांटे याचा स्वभाव , काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. कार्यकर्त्यांनी त्याचा भावी आमदार म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास आठवले यांना हवेचा अंदाज कळतो असे ते म्हणतात. आशिषच्या हवेचा अंदाज आला असेल तर तुम्ही आणि मी त्याला हात दिला तर हा तरुण सार्वभौम सभागृहात पाहायला मिळेल असे आवाहन त्यांनी आठवले यांना केले. आशिषचे संघटन कौशल्य बघितल्यानंतर अशा तरुणांची महाराष्ट्राला गरज आहे असे ते म्हणाले.
अजून १०-१५ वर्षे मोदींचीच हवा राहणार
काँग्रेसचे नसीम खान यांनी काही दिवसांपूर्वी आठवले यांनी काँग्रेसबरोबर यावे असे आवाहन केले होते. त्याला प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात, मी हवा पाहून कोणाबरोबर जायचा याचा निर्णय घेतो असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देत आठवले म्हणाले मी मला हवा कळते असे विधान केले होते, हे खरे आहे. मात्र, अजून १० ते १५ वर्षे मोदींचीच हवा राहणार आहे असेही म्हणलो होतो. मात्र,
माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. नरेंद्र मोदींची हवा सहजासहजी बदलणार नाही. मी जोपर्यंत नरेंद्र मोदींबरोबर आहे तोपर्यंत हवा बदलणार नाही. १०-१५ वर्षे मोदींची हवा झाल्यानंतर हवा कुठे आहे ते बघू असे मी म्हणालो होतो असेही त्यांनी
सांगितले.