पुणे-जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे स्मारक शनिवारवाड्यावर व्हावे, अशी आमची आधीपासूनच मागणी आहे. तसेच ज्या पुणे शहराचे नाव पुण्येश्वर महादेवावरून पडले, अमृतेश्वर महादेवावरून पडले त्या दोन्ही ठिकाणी आता मुस्लीम समाजाने अत्याचार करत आणि जबरदस्तीने दर्गे बांधले आहेत. संभाजी ब्रिगेडला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम असेल तर त्यांनी दर्गे उठवण्याची मागणी करावी, त्याला ब्राम्हण महासंघाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे सांगत ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘ जिजापूर नावाचे आम्ही स्वागतच करू असे स्पष्ट केले आहे .
ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे म्हणाले, आतापर्यंत देशातील ज्या-ज्या शहरांची नावे बदलण्याची मागणी करण्यात आली, त्या देशांची नावे मुस्लीम आक्रमकांनी ठेवली होती. तेव्हा त्यांनी अत्याचार करत, जबरदस्ती करत ती नावे ठेवली होती. परंतु पुणे शहराचा इतिहास, पुणे शहराचे नाव तशा भुमिकेतून ठेवण्यात आलेले नाही. तरीही पुण्यातील जनतेचे जिजापूर या नावावर एकमत झाले तर या नावाचे आम्ही स्वागतच करु. आम्हीच (हिंदुत्त्ववाद्यांनी) सर्वप्रथम ही भूमिका मांडली होती.