वाहतूक नियंत्रक दिव्यांचे चुकलेले ‘टायमिंग’ ठरतेय वाहतूक कोंडीला कारणीभूत
कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले उड्डाणपुले ठरताहेत निरूपयोगी ;आबा बागुल
पुणे –
शहरातील वाहतूक कोंडीला वाहतूक नियंत्रक दिव्यांचे चुकलेले ‘टायमिंग ‘ कारणीभूत ठरत असल्याची वस्तुस्थिती असून प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीला ‘खतपाणी ‘ मिळत असल्याकडे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी लक्ष वेधले असून सुरळीत वाहतुकीसाठी उभारण्यात आलेले उड्डाणपुलांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या पुणे शहरासाठी सुरळीत वाहतुकीकरता पुणे महानगरपालिकेने शहरात अनेक ठिकाणी उड्डाणपुले उभारली आहेत. सुरळीत वाहतूक हा एकमेव उद्देश असला तरी काही क्षुल्लक बाबींमुळे हे उड्डाणपूल निरुपयोगी ठरले आहेत. कोट्यवधी रुपये उड्डाणपुलांवर खर्च करूनही सुरळीत वाहतूक होण्याऐवजी वाहतूक कोंडीचा पुणेकरांना सामना करावा लागत असल्याची वास्तवता आहे. वाहतूक कोंडी का होत आहे ? कोणते घटक कारणीभूत आहेत ?याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, हेच मुळात खेदजनक आहे.त्यातही ही आमची जबाबदारी नाही ही भूमिकाही योग्य नाही. वास्तविक केलेल्या पाहणीनुसार जिथे जिथे सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाणपुले आहेत आणि अन्य ठिकाणीही वाहतूक कोंडीला वाहतूक नियंत्रक दिवे कारणीभूत ठरत आहेत. केवळ या दिव्यांचे ‘ टायमिंग ‘ चुकीचे असल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे आढळून आले आहे. कोणत्या रस्त्यावर कोणत्या वेळी रहदारी जास्त असते. कोणत्या रस्त्यावर कमी असते यानुसार वाहतूक नियंत्रक दिव्यांची वेळ निर्धारित असणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत चित्रच उलट आहे. जिथे रहदारी कमी आहे ,त्याठिकाणी वाहतूक नियंत्रक दिव्यांचा कालावधी जास्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या रस्त्यावर रहदारी जास्त आहे. तिथे वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील सर्वच वाहतूक नियंत्रक दिव्यांची वेळ रहदारीनुसार निर्धारित करून वाहतूककोंडी टाळून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.