पुणे –
स्वच्छतेत पुण्याला अव्वल ठरविण्यासाठी कंबर कसलेल्या पुणे महानगरपालिकेला स्वच्छता सर्वेक्षणात सार्वजनिक मुताऱ्यांची दुरावस्था कशी काय दिसत नाही ? असा सवाल करून माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी ”स्मार्ट सिटीच्या गप्पा बंद करा ;आधी सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता सुधारा” अशा शब्दात पालिका प्रशासनाला सुनावले आहे. इतकेच नाही तर जर हा प्रश्न तातडीने सुटला नाही तर अधिकाऱ्यांना या मुताऱ्यांमध्ये कोंडून ठेवण्याचे आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भांत आयुक्तांना दिलेल्या पत्रात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणची मोहीम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे ;पण शहरातील विविध सार्वजनिक मुताऱ्यांची अवस्था काय ? याकडे या सर्वेक्षणात दुर्लक्ष होत आहे. या मुताऱ्यांची अवस्था इतकी खराब आहे कि, त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे अशी वस्तुस्थिती आहे. दुर्गंधी , घाण असूनही नागरिकांना नाइलाजास्तव त्याचा वापर करावा लागत आहे. एकप्रकारे नरकयातना भोगाव्यात अशी स्थिती या मुताऱ्यांची झाली आहे.केवळ नव्या सार्वजनिक मुताऱ्या उभारून हा प्रश्न सुटणार नाही तर आधी स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. आरोग्य कोठीनिहाय या मुताऱ्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. पाणी, स्वच्छता आणि देखभालसाठी तरतूद करून या मुताऱ्यांची स्थिती सुधारावी मग त्यानंतरच स्वच्छता सर्वेक्षण असो किंवा स्मार्ट सिटीच्या गप्पा माराव्यात. जर तात्काळ कार्यवाही न झाल्यास या दुर्गंधीयुक्त आणि आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या शहरातील या मुताऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांना कोंडण्याचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा आबा बागुल यांनी दिला आहे.