‘पद्मश्री’ नामदेव ढसाळांचे साहित्य‘नोबेल’ पुरस्काराच्या योग्यतेचे ! – आचार्य रतनलाल सोनग्रा.
पुणे: राजगुरुनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर तर्फे पंचायत सभागृहात ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या नावाच्या काव्यप्रतिभा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अध्यक्षपदावरून बोलताना आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “पद्मश्री नामदेव ढसाळ” हे उपेक्षित वंचितांचे वास्तववादी साहित्यिक होते. त्यांनी दलित जनतेला जबर हिंमत दिली. त्यांच्या लढाऊ संघटनेचा धाक जातीयवादी लोकांना होता. त्यामुळे ग्रामीण भागातील दलितांना संरक्षण मिळाले. साहित्यकार हा कोणत्या जातीधर्माचा, राष्ट्राचा नसून तो संपूर्ण जगाचा आणि मानवतेचा प्रवक्ता असतो.
क्रांतीकारी विचारांची विद्रोही मंडळी हे विद्रूप कुरुप जग सुंदर करण्यासाठी झटतात. ते सौंदर्याचा द्वेष करू शकत नाही. प्रख्यात क्रांतीकारी राजगुरू यांची आठवण सांगताना आचार्य सोनग्रा म्हणाले,“एकदा आपल्या खोलीत त्यांनी एका सुंदर महिलेचे कॅलेंडर टांगले. भगतसिंह, सुखदेव राजगुरूच्या खोलीत ते चित्र पाहून चंद्रशेखर आझाद यांनी ते कॅलेंडर फाडून टाकले. राजगुरूंनी चंद्रशेखरांना विचारले तुम्ही ते कॅलेंडर का फाडले? ‘जग सुंदर करायला निघालात.. सुंदर गोष्टींना नष्ट करून कसे चालेल?’ चंद्रशेखर यांनी राजगुरूंकडे दिलगिरी व्यक्त केली.
पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे साहित्य जागतिक उंचीचे आहे. भारताला जर साहित्याचे नोबेल मिळाले तर ते पद्मश्री नामदेव ढसाळ सारख्या प्रखर साहित्यिकालाच मिळेल!”सासवड साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. विजय कोलते यांनी म. सा. प. ची चळवळ ग्रामीण भागात वळविण्यावर भर दिला.
म.सा.प. शाखा राजगुरूनगर, ग्रामपंचायत पुर व कै. नानासाहेब गोरंडे सार्वजानिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पाच काव्यसंग्रहांना रोख रक्कम, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. लोककवी श्री. प्रशांत मोरे च्या सुमधुर आवाजातील कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. लोककवी श्री. प्रशांत मोरेंना आचार्य सोनग्रा यांनी आपला कबीरवाणी ग्रंथ भेट देऊन गौरव केला. दुसर्या सत्रात कसदार कवींचे बहारदार कवी संमेलन रंगले. सौ. शोभा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवीसंमेलनात सुमारे ४० कवींनी सहभाग घेतला. यात आमदार श्री. जयदेव गायकवाड, दूरदर्शनचे माजी उपमहासंचालक अरूणम् सकट यांनी श्री. नामदेव ढसाळांच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व प्रास्तविक अध्यक्ष श्री. संतोष गाढवे यांनी केले तर नियोजन उपाध्यक्ष सदाशिव अमराळे यांनी केले. धर्मराज पवळे यांनी सूत्रसंचालन तर स्मिता पवळे यांनी आभार मानले.