पुणे :- डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नागरिकांना
२,००० रोपांचे वाटप करण्यात आले. डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने गेल्या १० वर्षापासून हा
उपक्रम राबविला जातो. यावेळी टेरी पॉलिसी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे, डी. एस. कुलकर्णी
फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के आणि फौंडेशनच्या विश्वस्थ भाग्यश्री कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते
म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे सर्वांना रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, पर्यावरणाचे महत्त्व जगातील प्रत्येक माणसाला लक्षात यायला हवे.
आज प्रदूषणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्याला कुठेतरी आळा बसायला हवा. शहरीकरणाच्या
भोवऱ्यात पर्यावरणाची सुरक्षा मात्र भरकटत आहे, हे थांबायला हवं. येणाऱ्या पिढीमध्ये सुदृढ पर्यावरण
टिकविण्यासाठीची सुरुवात स्वत:पासून करायला हवी ही भावना प्रत्येकामध्ये रुजवायला हवी शासनाने
पर्यावरण रक्षणासाठी तयार केलेले कायदे हे सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होण्यासाठीच्या हेतूनेच
बनविलेले आहेत.या कायद्यांची अंबलबजावणी करण्यासाठी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केल्यास पर्यावरण व
प्रदुषणाचे प्रश्न नक्कीच सोयीस्कर रित्या सोडवता येतील.
एक कापडी पिशवी बाळगल्यास रोजच्या कचऱ्यातील तीन-चार पिशव्या कमी होऊ शकतात तसेच ओला
आणि सुका कचरा वेगळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावूया. पर्यावरणपूरक सण साजरे
करूयात आणि प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याची जोपासना करावी, अशा छोट्या गोष्टी ज्या वरवर
पाहता फार छोट्या वाटतात पण प्रत्येकाने हळू-हळू या सवयी अंगीकारल्यास खूप मोठा बदल आपण
घडवून आणू शकतो अशी भावना श्याम भुर्के यांनी व्यक्त केली.
पर्यावरणाचा र्हास, प्रचंड प्रमाणात होत असलेली जंगलतोड रोखली जावी आणि आपल्या आजुबाजूचा
परिसर निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संदेश या उपक्रमातर्फे देण्यात आला. पंडित
पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर भाग्यश्री कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.