प्रा. मनोहर हिबारे यांच्या 6 पुस्तकांचे प्रकाशन
पुणे :
सरंजामशाहीच्या प्रभावाखालील मराठवाड्याला नवे भान देण्याचे काम ‘युक्रांद’ सहित अनेक सामाजिक संस्थांनी केले. या कार्यकर्त्यांनी माणसांची जिद्द, निष्ठा यांचे साहित्यिक लिखाण करण्याचे काम केल्यास ती महत्त्वपूर्ण नोंद ठरेल’ असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.
‘युक्रांद’ च्या चळवळीतील मराठवाडयातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.मनोहर हिबारे यांच्या 40 वर्षांच्या सामाजिक कामातील अनुभवानंतर तयार झालेल्या सहा पुस्तकांचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ.वासुदेव मुलाटे, अन्वर राजन यांच्या हस्ते झाले. तेव्हा डॉ. कोतापल्ले बोलत होते. बुधवारी सायंकाळी एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘शब्दांचं चांदणं’ (कवितासंग्रह), ‘निवडणूक प्रचाराचे तंत्र’, ‘फुले विचार आणि मुक्त रेखाटने’,‘सप्तरंगी मॉरिशस’, ‘नामिक अनामिकांच्या व्यक्तिरेखा’ आणि ‘दोन एकांकिका’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
डॉ. कोतापल्ले म्हणाले, ‘प्रा मनोहर हिबारे यांच्या लिखाणात निझामशाहीच्या जोखडातून संरजामशाहीच्या जोखडातून जाग्या झालेल्या मराठवाड्याचे प्रतिबिंब पडले आहे. मराठवाड्याला नवे भान देण्याचे काम ‘युक्रांद’सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रा. हिबारे यांनी केले. माणसांची जिद्द, निष्ठा, कार्यकर्त्यांचे जीवन यांच्यावर कार्यकर्त्यांनीच लिखाण करणे साहित्यात आवश्यक आहे. हे योगदान महत्त्वपूर्ण साहित्यिक नोंद ठरेल. ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागात जीव ओतला, त्यांची साहित्याने नोंद घेतली पाहिजे.’
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘परिवर्तनाची भूक असलेल्या मराठवाड्याला ‘युक्रांद’ने सामाजिक कामाची प्रयोगशाळा मानले. त्यातून प्रा. मनोहर हिबारे यांच्यासारखे कृतीशील कार्यकर्ते तयार झाले. अन्याय झाला की, जोरदार आवाज उठवणे, आणि रस्त्यावर प्रश्न सोडवणे ही या चळवळीची खासियत होते. पाश्चिमात्य समाजाप्रमाणे आपल्या समाजानेही आपापले अनुभव लिहिण्याची सवय लावली पाहिजे म्हणजे प्रगती होईल. नवनवीन अनुभव लिहिणारा कार्यकर्ता हा उत्तम साहित्यिक होऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.
लेखन, अभिव्यक्तीवर येत असलेल्या आक्रमणांची बंधनांची नोंद घेत अन्वर राजन यांनी सरकार अस्तित्वात आहे की नाही, अघोषित सेन्सॉरशीप आहे का? हाच प्रश्न पडतो, असे सांगितले. अंजली कुलकर्णी, धनंजय झाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भावसार, संदीप बर्वे, डॉ. उर्मिला सप्तर्षी इत्यादी उपस्थित होते.