‘सबके साथ सबका विकास’ असे म्हणत ‘अच्छे दिन आनेवाले है’ च्या स्वप्नात कोठेतरी गुंग असतानाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दारात येउन उभ्या ठाकल्या . लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भुइसपाट झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला एकमेकांची संगत कुसंगत वाटू लागल्याने एकमेकांनी मुख्यमंत्री पदावरून वाद वाढविला , तर दुसरीकडे गेली २५ वर्ष ‘तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना’ चे सूर सुरात मिसळून गात गात आपल्या जागा वाढल्याचा साक्षात्कार भाजपला झाला व आता महाराष्ट्रात मोठी त्सुनामी घडविण्यासाठी आपल्याला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत अशी जोरदार मागणी सेनेकडे केली . जागावाटपावरून इकडे महायुतीत तर तिकडे आघाडीत बिघाडी झाली व शेवटी ऐन घटस्थापनेच्या दिवशीच प्रत्येकाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला . त्यामुळे ‘आमदार व्हायचय मला ‘असे म्हणणाऱ्या व निवडणूक लढाऊ इच्छिणाऱ्या लोकांची एकच गर्दी सर्वत्र दिसू लागली . प्रचाराला सुरवात झाली , प्रत्येक पक्ष ,उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करू लागला . कोणी ही हे शक्य आहे असे बोलू लागले ,कोणी सगळ्यात पुढे महाराष्ट्र माझा म्हणू लागले ,कोणी चला , उठा घडवू या नवा महाराष्ट्र , तर कुणी शिवछत्रपतींचा आशीर्वाद देवू मोदींना साथ’ असा नारा देत अरे कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’अशी हाकाटी झाल्याने सर्वच महाराष्ट्र हबकून गेला या सर्व गदारोळात जे लोक आपला महाराष्ट्र घडवू असे म्हणतात त्यांची गुणवत्ता काय ?हे मात्र पाहण्यास कोणी तयार नाही . तेव्हा दिवस आहेत इलेक्शन चे ,पुणे जिल्ह्यातील २१ जागांसाठी ३०८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यात मुन्नाभाई एमबीबीएस ५ , कायद्याचे बोला म्हणणारे १३ तर जाऊ बाई जोरात च्या आवेशात २५ जनी नारीशक्ती ची ताकद आजमावत आहेत . प्रत्येक पक्षाने त्यांच्या उमेदवारांचे पक्षीय मेरीट नुसार सिलेक्शन केले असले तरी त्यांचे क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक असेच नाही म्हणायचे तर समाज हितासाठी असलेली मानसिकता काय आहे हे जरा पहा तर खरे .
१९५ – जुन्नर विधानसभा मतदारसंघ – गेली ६ पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यात आपली एकहाती छाप सोडणारे वल्लभ बेनके यांनी या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी उमेदवारी मात्र आपल्याच घरात ठेवत आपली राजकीय ताकद सर्वाना दाखविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर या वेळी निवडणूक लढणारया अतुल बेनके (बीई सिव्हिल ) यांना शिवसेनेच्या आशा बुचके (७ वी ), काँग्रेसचे गणपत फुलवडे (बी एस सी ) ,भाजपाचे नेताजी डोके ( ८ वी ) मनसे चे शरद सोनवणे ( एफ वाय बी कॉम ) यांचे आव्हान असणार आहे .
१९६ – आंबेगाव विधानसभा मतदारसंघ – लोकसभेला वेगळा तर विधानसभेला वेगळा निर्णय करणाऱ्या या मतदार संघात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ( एल एल बी , एल एल एम ,वृतपत्रविद्या ) यांना त्यांचे एके काळचे सहकारी शिवसेनेकडून अरुण गिरे ( बी ए ) भाजपा कडून जयसिंग एरंडे ( ११ वी ) यांच्याबरोबरच कॉंग्रेसच्या संध्या बाणखेले ( बी कॉम . एल एल बी ) यांनी आव्हान दिले आहे
१९७ – खेड -आळंदी मतदारसंघ – गेल्या अनेक वर्षापासून सेझ, चाकण विमानतळ या बरोबरच वाढत्या औद्योगिक गुन्हेगारी मुळे चर्चेत असलेल्या या मतदार संघात विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आ. दिलीप मोहिते (एस .एस . सी ) यांना शिवसेनेचे सुरेश गोरे ( बी कॉम ) भाजपचे शरद बुट्टे पाटील (एम ए राज्यशास्त्र ) यांच्याबरोबरच काँग्रेसच्या वंदना सातपुते ( एच एस सी ) यांचे आव्हान आहे
१९८ – शिरूर विधानसभा – सार्वजनिक वितरण (रेशन) प्रणालीत राज्यात पहिल्यांदा बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. अशोक (बापू) पवार ( बी एस सी एयाग्री ,एल एल बी ) यांना भाजपा चे बाबुराव पाचार्णे (एच एस सी ),शिवसेनेचे संजय सातव ( एस .एस . सी) यांच्या बरोबर बहुजन मुक्ती पार्टीचे डॉक्टर मगन ससाणे (एम. बी .बि एस ) यांचे आव्हान आहे
१९९ – दौंड विधानसभा – विद्यमान राष्ट्रवादीचे आ. रमेश थोरात यांना रा स प कडून राहुल कुल , शिवसेनेचे राजन खट्टी ,काँग्रेस चे आत्माराम ताकवणे यांच्याबरोबर उद्योजक विकास (आबा ) ताकवणे यांचे आव्हान आहे
२०० – इंदापूर विधानसभा – राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो मंत्रिमंडळात महत्वाचे खाते मिळणाऱ्या काँग्रेस चे हर्षवर्धन पाटील ( बी कॉम एल एल बी) यांच्यासमोर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , राष्ट्रवादी चे दत्ता भरणे (एस वाय बी कॉम ), शिवसेनेचे विशाल बोंद्रे (डी एम ई ) भाजप चे न्यान्देव चवरे ( एस एस सी ) या दिग्गजांचे आव्हान आहे
२०१ – बारामती विधानसभा – राज्याचे माजी उप मुख्यमंत्री ,राष्ट्रवादीचे अजित पवार ( एस एस सी ) यांना भाजपचे बाळासाहेब गावडे (बी ए ) यांच्याबरोबरच शिवसेनेचे राजेंद्र काळे ( बी कॉम एल एल बी , जी डी सी ए ) व काँग्रेस चे आकाश मोरे ( बी ए एल एल बी ) या कायदे पंडितांनी आव्हान दिले आहे
२०२ – पुरंदर विधानसभा – शिवसेनचे विद्यमान आ. विजय शिवतरे (डी एम ई ) यांना राष्ट्रवादी चे अशोक टेकावडे (बी कॉम ) , काँग्रेस चे संजय जगताप (बी कॉम) यांच्या बरोबरच भाजप च्या संगीतादेवी निंबाळकर (बी .ए ) आव्हान दिले आहे
२०३ – भोर विधानसभा – काँग्रेस चे विद्यमान आ. संग्राम थोपटे ( बी ए ,राज्यशास्त्र ) यांना शिवसेनेचे कुलदीप कोंडे (११ वी ) राष्ट्रवादीचे विक्रम खुडवट (बी कॉम ) यांचे प्रमुख आव्हान आहे
२०४ – मावळ विधानसभा – भाजपचे संजय उर्फ बाळा भेगडे (बी कॉम ) यांच्या समोर राष्ट्रवादी चे माऊली दाभाडे (जुनी ११ वि फायनल ) , काँग्रेस चे किरण गायकवाड (डी सी ई ) शिवसेनेचे मच्छिन्द्र खराडे (बी कॉम ) यांनी आव्हान उभे केले आहे
२०५ – चिंचवड विधानसभा – अनाधिकृत बांधकामे नियमित करावी या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा देणारे माजी आमदार आणि आताचे भाजपचे उमेदवार लक्ष्मन जगताप (एस.एस सी ) यांना राष्ट्रवादीचे विठ्ठल तथा नाना काटे (११ वी) , शिवसेने चे राहुल कलाटे (बि. कॉम ) , काँग्रेस चे कैलास कदम ( एस.एस सी) मनसे चे अनंत कोऱ्हाळे ( बी कॉम ) यांच्याबरोबर निता ढमाले , मोरश्वर भोंडवे या अपक्षांनी घेरले आहे
२०६ – पिंपरी (राखीव) -राष्ट्रवादी चे विद्यमान आ. अण्णा बनसोडे (आयटी आय माशिनिष्ट ) यांना (एकूण ५ महिला ) रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट ) चंद्रकांता सोनकांबळे (एम ए ),मनसे च्या अनिता सोनावणे ( ७ वी) मंगल कांबळे ,आशा रणदिवे मीना खिलारे या नारीशक्ती बरोबरच शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार ( बि. कॉम एल. एल .बि ,) एम .ए (पाली भाषा ),कॉंग्रेस चे मनोज कांबळे ( बि. कॉम एल. एल .बि प्रविष्ट ) बहुजन समाज पार्टी चे क्षितीज गायकवाड (बी .एस .एल,एल एल बी ) या कायदे पंडितांनी घेरून ठेवले आहे
२०७ – भोसरी विधानसभा – पुणे जिल्ह्यात सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या ” नो उल्लू बानाविंग” चा उद्घोष चालू असलेल्या या मतदार संघात काट्याची लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादीचे आ. विलास लांडे (एस वाय बी ए -टिळक मुक्त विद्यापीठ -२०१३-१४) यांच्यासमोर अपक्ष व विद्यमान स्थायी सभापती महेशदादा लांडगे ( बी . कॉम ( २०१२) , विनायका मिशन्स विद्यापीठ , तामिळनाडू ), भाजपचे एकनाथ पवार ( आयटी आय ,१० वी) शिवसेनेच्या सुलभा उबाळे ( एच एस सी ,सायन्स ) यांचे आव्हान ठाकले आहे
२०८ – वडगाव शेरी – राष्ट्रवादीचे आ. बापू पठारे (९ वी ) यांच्यासमोर काँग्रेस चे चंद्रकांत छाजेड ( बि. कॉम एल. एल .बि ,एल एल एम ),शिवसेनेचे सुनील टिंगरे (डी सी ई ),भाजपचे जगदीश मुळूक (बी ए ),व आर पी आय चे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे (एम बी बी एस ,शरीर शास्त्र ) कडवी झुंज देत आहेत
२०९ -शिवाजीनगर विधानसभा – काँग्रेस चे विद्यमान आमदार विनायक निम्हण (एच एस सी ) यांना राष्ट्रवादी चे अनिल भोसले ( एस .एस सी ),भाजप चे विजय काळे (एस. एस. सी ) मनसे चे राजू पवार (११ वी) लढत देत आहेत
२१० – कोथरूड -शिवसेनेचे आ. चंद्रकांत मोकाटे ( बी ए राज्यशास्त्र विशारद ) यांना मनसे चे किशोर शिंदे (बी कॉम ,एम सी एम . एल एल एम .एम बी ए (प्रवी),भाजपच्या मेघा कुलकर्णी (एम एड ),कोन्ग्रेस चे उमेश कंधारे (बी कॉम )यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे (९ वी ) यांच्याशी सामना करावा लागत आहे
२११ – खडकवासला विधानसभा – मागिल विधानसभेत गोल्डन म्यान म्हणून गाजलेल्या स्व. रमेश वांजळे यांच्या या मतदारसंघातील विद्यमान भाजपा आ. भीमराव तापकीर (एच एस .सि ) यांची लढत कॉंग्रेस चे श्रीरंग चव्हाण (१० वी )शिवसेनेचे शाम देशपांडे (एम कॉम , एम पी एम ) राष्ट्रवादीचे दिलीप बराटे (एम एस डब्लु ) मनसे राजाभाऊ लायगुडे (७ वि) होत आहे
२१२ – पर्वती मतदारसंघ – विद्यमान भाजपा आ. माधुरी मिसाळ (बी कॉम ) यांची लढत काँग्रेस चे अभय छाजेड (बी एस सी ,एल एल बी ,वृत्तपत्रविद्या),राष्ट्रवादी चे सुभाष जगताप (एस. एस सी ) शिवसेनेचे सचिन तावरे ( बी कॉम),मनसे चे जयराज लांडगे ( एस. एस सी) यांच्याशी होत आहे
२१३ – हडपसर विधानसभा – शिवसेनेचे विद्यमान आमदार महादेव बाबर (एस. एस सी) यांना राष्ट्रवादी चे चेतन तुपे (एफ वाय ) कॉंग्रेस चे बाळासाहेब शिवरकर (बी ए ),मनसे चे व त्यांचे एके काळचे सहकारी नाना भानगिरे (एस. एस सी) आव्हान देत आहेत
२१४ -पुणे कॅन्टोमेन्ट – कॉंग्रेसचे विद्यमान आ रमेश बागवे (बी ए )यांना भाजपचे दिलीप कांबळे (बी ए),शिवसेनेचे परशुराम वाडेकर ( ८ वी) ,राष्ट्रवादीचे भगवान वैराट (१० वी) व मनसे चे अजय तायडे (एच एस सी ) आव्हान देत आहेत
२१५ – कसबा पेठ विधानसभा – भाजपचे गेले अनेक वर्ष नेतृत्व करणारे आ. गिरीश बापट (बी कॉम ) यांना या वेळी राष्ट्रवादीचे दीपक मानकर(जुनी अकरावी ) यांचे आव्हान आहे काँग्रेसचे युवकनेते रोहित टिळक (एम कॉम .एम पी एम ,डी लिट इतिहास ) या उच्च शिक्षता बरोबरच शिवसेनेचे प्रशांत बधे (एस एस सी )मनसे चे रवींद्र धंगेकर ( ८ वी) यांच्याशी सामना करावा लागत आहे
अर्थात शिक्षण हा घटक येथे महत्वाचाच नसला तरी खरोखर समाजहिता वर मनापासून निस्सीम प्रेम असणारी आणि त्यासाठी झटणारी ,तळमळ असणे महत्वाचे आहे याची पारख मतदार करतो काय ? कि धनशक्ती -दहशत – भूलभुलय्या याला भुलतो ? इतर सर्व गोष्टी आपण पारखून घेतो पण मतदान करताना आपल्या डोळ्यावर पक्षाची पट्टी बांधून आपण डोळे झाकून कसे मतदान करू शकतो हे एक न उलगडणारे कोडे आहेअसे मला वाटते … आपला -सदाभाऊ