एनआयपीएम तर्फे कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे चर्चासत्र संपन्न
पुणे8 : भारतातील कुशल मनुष्यबळ,त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना व पाश्चिमात्य देशांचे उत्पादन प्रक्रियेसाठी भारताकडे केंद्रित झालेले लक्ष यामुळे उत्पादन क्षेत्रात भारत मोठ्या प्रगतीच्या टप्प्यावर आहे,असे मत भारत फोर्जचे कार्यकारी संचालक अमित कल्याणी यांनी व्यक्त केले. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) पुणे चॅप्टर तर्फे ‘ऑर्गनायझेशनल चॅलेंजेस फॉर द फ्युचर ऑफ वर्क’ या विषयावर हॉटेल ग्रँड शेरटन येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. याप्रसंगी एनआयपीएमचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
अमित कल्याणी म्हणाले की, ज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे जर्मनीसारख्या देशांनी मोठी प्रगती केली. मात्र आता हे आपल्याकडेही असून आपणही मोठ्या प्रगतीच्या टप्प्यावर आहोत. मात्र हे करत असताना तंत्रज्ञानाचा अंगीकार व उत्पादन प्रक्रिया व कार्यपध्दतीमध्ये काळानुसार बदल करणे गरजेचे आहे.
इंडस्ट्री 4.0 प्रणाली,ऑटोमेशन,रोबोटिक्स,व्हर्च्युअल रिअॅलिटी इत्यादींमुळे मोठे बदल घडू लागले आहेत. तंत्रज्ञानाचा रोजगारावरती मोठा प्रभाव पडत आहे. एकसुरी कामाची जागा ऑटोमेशन घेत आहे. त्यामुळे आयटी उद्योगातील रोजगारावर परिणाम होऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की, उत्पादन क्षेत्रासमोर चांगले मनुष्यबळ मिळविणे हे एक मोठे आव्हान असते. फक्त कौशल्यच नव्हे तर काहीतरी करून दाखविण्याची इच्छा ही तरूणांमध्ये महत्त्वाची ठरणार आहे व अशा लोकांना कंपन्यांमध्ये संधी मिळेल.कौशल्य प्रशिक्षणाच्या जबाबदारीसाठी पुढाकार हा कंपन्यांनीच घ्यावा. शिक्षणपध्दतीमध्ये आमुलाग्र बदल घडण्याची गरज आहे. सध्या पदवी मिळवून मग काम करण्याची पध्दत आहे. ही पध्दती बदलण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये विविध कामकाज विभागांमध्ये काम करण्याची संधी देऊन मग त्यांची आवड बघितली पाहिजे.त्यानंतर त्यांनी त्यांची पदवी पूर्ण केली पाहिजेे.अशा दुहेरी प्रणालीमुळेच जर्मनीची प्रगती झाली.
अमित कल्याणी म्हणाले की,मोठ्या जर्मन कंपन्या एकत्रितपणे संशोधन करतात,जे आपल्याकडे पाहायला मिळत नाही.पुण्यात सीओईपी,एआरएआयसारख्या अनेक संस्था आहेत.जिथे कंपन्यांनी एकत्रित संशोधन करायला काहीच हरकत नाही.एमटेकच्या विद्यार्थ्यांमार्फत देखील संशोधनामध्ये हातभार लागू शकतो.
ते पुढे म्हणाले की,उशिरा प्रगतीपथावर येणे हे भारतीय कंपन्यांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण करीत नाही.उलट जगातील बड्या व दिग्गज कंपन्यांवरचे ओझे आपल्या कंपन्यांवर नसल्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे.भारताने अनेक क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे.अक्षय उर्जा क्षेत्र त्यापैकी एक आहे.पुढील संधी ही आरोग्यसेवा,पाणी व्यवस्थापन,पर्यावरण यांसारख्या उभरत्या क्षेत्रांमध्ये आहे.
याप्रसंगी एसव्ही भावे यांनी लवकरच होणार्या नॅटकॉम परिषदेविषयी माहिती दिली.या परिषदेच्या बोधचिन्हाचे यावेळी अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता देसाई यांनी केले.