पुणे भारतातील तिसरी सर्वात मोठी कर्ज देणारी बँक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी “बडोदा किसान” हा शेतीशी निगडित डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. २१ सप्टेंबर २०१९ रोजी बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी एस जयकुमार यांनी याचे उदघाटन केले. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक श्री. विक्रमादित्य सिंग खिची, शेती व आर्थिक समावेश – मुख्य व्यवस्थापक (चीफ को-ऑर्डिनेशन) श्री. बी आर पटेल, बँकेचे मुख्य व क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर उपस्थित होते. शेतकरी, स्वयं-सहायता गटांच्या महिला सदस्या आणि गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
“बडोदा किसान” हा शेतीशी निगडित राष्ट्रीय पातळीवरील डिजिटल प्लॅटफॉर्म असून शेतकऱ्यांच्या विविध गरजा याठिकाणी पूर्ण होतील. हे वेब आधारित पोर्टल असून मोबाईलवर सहज वापरता येऊ शकते. यामध्ये लँडिंग पेज म्हणून एम कनेक्ट प्लस मोबाईल अप्लिकेशनचा वापर केला जाईल. हा प्लॅटफॉर्म माहिती तंत्रज्ञानावर आधारित असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख गरजा याठिकाणी पूर्ण होतील. यामध्ये विविध प्रकारच्या सूचना, हवामानाचा अंदाज, पिकांची स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण, वेगवेगळ्या किडींबद्दल माहिती, बाजारभाव, पिकांसंबंधी सल्लासेवा आणि कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी नवनवीन आर्थिक पर्याय इत्यादींचा यामध्ये समावेश असेल. यापैकी काही सेवांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, उदाहरणार्थ, आगाऊ अंदाज, विश्लेषण, इमेज सेन्सिंगवर आधारित पिकांचे ग्रेडिंग, किडींबद्दल आगाऊ माहिती इत्यादी. भविष्यात टप्प्याटप्प्याने या प्लॅटफॉर्ममधे विविध सेवांचा समावेश करण्यात येईल. सध्या याची सुरुवात गुजरातपासून करण्यात आली आहे.
यावेळी “बडोदा किसान” या शेतीशी निगडित डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्याबरोबरीनेच अनेक इतर उपक्रम देखील सुरु करण्यात आले. देशभरातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक प्रस्तावांवरील कार्यवाही केंद्रीय पद्धतीने व्हावी यासाठी बँकेने गांधीनगर आणि हैदराबाद येथे सुरु केलेल्या केंद्रांचे उदघाटन, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्यासाठी घरगुती सुविधांचे बांधकाम, नूतनीकरण यासाठी कर्ज योजनेचा शुभारंभ, ग्रामीण भागांमध्ये घरबांधणीसाठी कर्ज योजनेचा शुभारंभ हे कार्यक्रम देखील यावेळी पार पडले.
याशिवाय बँकेच्या किसान क्रेडिट कार्ड, स्वयं-सहायता गट, दुग्धव्यवसाय, स्मार्टफोन्स, शेती उपकरणे इत्यादी योजनांतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज स्वीकृती पत्रे व धनादेश यांचेही वाटप यावेळी करण्यात आले. प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना यासारख्या विविध सामाजिक योजनांच्या लाभार्थींना देखील धनादेश यावेळी देण्यात आले. बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने बँकेने स्थापन केलेल्या आरएसटी संस्थांमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना यावेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मुख्य व्यवस्थापक व ऍग्रिकल्चरल ऍडव्हान्स विभागाचे प्रमुख श्री. पी. विनोद कुमार रेड्डी यांनी आभारप्रदर्शन केले व कार्यक्रम समाप्त झाला.