पुणे: सध्या मराठी चित्रपट सृष्टी चांगल्या संक्रमणातून चालली असून यामुळे मराठी कलाकारांनीही सुगीचे दिवस आले आहेत. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाला कलाकारानेही प्रामाणिकपणे जागून त्यांस आपल्या अभिनयाने प्रेमाचीच पावती देणे क्रमप्राप्त आहे, असे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी याने व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कट्ट्यावर मुंबई पुणे मुंबई फेम हिट जोडी मुक्ता बर्वे, स्वप्निल जोशी, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.
मुंबई पुणे मुंबई या शृखंलेतील तिसरा भाग येत्या 7डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्कंठा वाढीस लागली असताना सांस्कृतिक कट्यावरच्या या चर्चेने चांगलीच रंगात आणली.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी मुंबई पुणे मुंबई या पहिल्या भागाला मिळालेल्या चांगल्या यशाबाबत प्रेक्षकांना धन्यवाद देताना हा प्रवास तब्बल 7वर्षे चालेल असे वाटले नव्हते, अशी भावना व्यक्त केली. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्ही या शृखंलेतील तिसरा भाग लवकरच प्रदर्शित करीत असून यामधील लग्न झालेली गौतम आणि गौरी हे प्रेक्षकांना नक्कीच भावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अभिनेता स्वप्निल जोशी म्हणाले कि, पहिल्या भागात गौतम व गौरी यांतील प्रियकर व प्रियसी सर्वांना भावली. दुसऱ्या भागात या पात्रांचा लग्नाच्या दरम्यानचा कौटुंबिक जिव्हाळ्याने प्रेक्षकांना आपलेसे केले. तिसऱ्या भागात देखील लग्न झालेल्या गौतम व गौरीला कुठेतरी आपल्यात शोधू याचा नक्कीच भास होईल. गौतम आणि गौरीचा तिसऱ्या पर्वातील प्रवासही सर्वसामान्यांना तितकाच आपलेसा व रोमांचित करणारा असेल, अशी ग्वाही मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी याने दिली.
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाल्या की, या चितरपटांची श्रुंखलेतील सर्व कलाकार म्हणजे एक कुटंबच झाले असून आपल्या व्यस्त दिनचर्येतून या चित्रपटास अनेक जेष्ठ अभिनेते व अभिनेत्री वेळात वेळ काढून उपलब्ध होतात याला कारण म्हणजे आमच्यातील जमलेली छानशी केमिस्ट्रीच. चित्रपटाच्या यशात याच केमिस्ट्रीचा खूप काही हात आहे, असे मला वाटते.