मराठीत नेहमीच वेगवेगळया विषयांवर आधारित सिनेमे बनत असल्याचं इतर चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनीही कबूल केलं आहे. विषय आणि आशयाची एकसंध मांडणी करून लिहिलेली पटकथा आणि त्याला दिलेली मनोरंजक मूल्यांची जोड या कारणांमुळे मराठी चित्रपट इतर प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत उजवा ठरतो. याशिवाय अनोख्या शीर्षकांमुळेही मराठी चित्रपट वेगळं अस्तित्व जपण्यात यशस्वी होतो. असंच एक वेगळं शीर्षक असलेल्या‘फ्लिकर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.
निर्माते राज सरकार यांनी ‘महेक फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘फ्लिकर’ या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आपल्या कोणत्याही कार्याची सुरूवात करणारे तसेच आपल्या मातृभाषेबाबत मनात अत्यंत आपुलकीची भावना असणाNया राज सरकार यांच्या म्हणण्यानुसार मराठी सिनेमा आशय आणि विषयाच्या बाबतीत जागतिक सिनेमाच्या तोडीचा आहेच, पण त्याला आणखी ग्लॅमरची जोड देण्याचा प्रयत्न ‘फ्लिकर’च्या निमित्ताने केला जात आहे. याबाबत विस्ताराने बोलताना सरकार म्हणाले की, हा सिनेमा केवळ मनोरंजन करणारा नसून जीवन जगण्याचा अचूक मंत्र सांगणाराही असेल. मनाला भिडणारं कथानक, कर्णमधुर संगीत,सहजसुंदर अभिनय, नेत्रदीपक सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे बनवला जाणारा ‘फ्लिकर’ हा सिनेमा मराठी रसिकांसोबतच अमराठी प्रेक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांनाही आपलासा वाटणारा ठरेल असा विश्वास सरकार यांनी व्यक्त केला.
‘फ्लिकर’च्या माध्यमातून मराठी सिनेपटलावर राजवीर सरकार या नव्या ता-याचा उदय होणार आहे. हँडसम लुक, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज, लक्षवेधी अभिनयशैली असं व्यक्तीमत्त्व असणा-या राजवीरचा हा पहिलाच सिनेमा असला तरी रसिकांवर मोहिनी घालण्याची क्षमता त्याच्या ठायी आहे. राजवीरच्या जोडीला तन्वी किशोर ही अभिनेत्री या सिनेमात चमकणार आहे. दोघांची अनोखी केमिस्ट्री या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पाडावे करीत आहेत. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांच्या जादुई संगीताचा स्पर्श लाभणं हे फ्लिकरचं अहोभाग्य म्हणावं लागेल. या निमित्ताने इलायराजा यांनी प्रथमच एखाद्या मराठी सिनेमाला पूर्णपणे संगीत दिलं आहे. याशिवाय‘कोलावरी डी…’ फेम धनुषने या चित्रपटासाठी एक गाणंही गायलं आहे.
‘फ्लिकर’मध्ये राजवीर सरकार, तन्वी किशोर, सयाजी शिंदे, संजय मोने, शुभांगी लाटकर,पूजा पवार, अरूण कदम, गौरव घाटणेकर, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, विशाखा सुभेदार,प्रभाकर मोरे, सायली जाधव, प्रतिक्षा शिर्के या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच अमोल पाडावे यांनीच या सिनेमाची कथादेखील लिहिली आहे. पटकथा जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिली असून संवाद समीर सामंत आणि मंदार चोळकर यांचे आहेत. कॅमेरामन उदयसिंग मोहिते या सिनेमाचे छायांकन करीत असून महेश पावसकर असोसिएट दिग्दर्शक आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी संदिप काळे यांच्याकडे असून प्रशांत राणे या सिनेमाचे कला दिग्दर्शक आहेत.