बॉलीवूडच्या टिपीकल झगमगाटात न रमता आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न मोजकेच दिग्दर्शक करतात. यामध्ये झोया अख्तरचे नाव प्राधान्याने येते. तिने यावेळी आपल्या झोनच्या पलीकडे जात एक वेगळा, फुल्ल टू एनर्जी असलेला ‘गलीबॉय’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. रणवीर सिंह आणि आलीया भटने कमाल अभिनय केलेले हा‘गलीबॉय’ मनाला भावतो.
‘गलीबॉय’ ही कथा आहे, मुंबईतील धारावी १७ मध्ये राहणाऱ्या मुराद (रणवीर सिंह) या महावियायालीन मुलाच्या संघर्षाची आणि जिद्दीची. झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या मुरादला आपल्या गरिबीवर मात करायची आहे, त्यासाठी काय करावं याबद्दल त्याला फारसं काही माहीत नाही. मात्र स्वतःचं अस्तित्व शोधताना त्याला व्यक्त होण्याचा एका मार्ग सापडतो तो म्हणजे लिखाण. ग्रज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुरादला एक मैत्रीण आहे सफीना (आलिया भट्ट), ती एका श्रीमंत घरातली मुलगी असून ती सर्जन होणार आहे. दरम्यान मुरादचे वडील (विजय राज) दुसरं लग्न करतात. आईची होणारी फडफड तो पाहतो. पण वडिलांसमोर बोलायची त्याची हिंमत नाही. दरम्यान, मुरादच्या कॉलेजमध्ये रॅपर एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) येतो. या दिवसापासून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळायला लागते, कारण आपण जे लिखाण करतो ते म्हणजे रॅप असल्याची जाणीव त्याला होते. मग आपणही एमसी शेर सारखे व्हावे असे मुरादला वाटते. दरम्यान त्याची ओळख म्युझिक प्रोग्रामर स्कायशी (कल्की कोचलीन) होते. मात्र नोकरी की रॅप या द्विधा मनःस्थितीत तो असतो. मुराद त्याचं रॅपर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण करतो का? हे जाणून घेण्यासाठी एकदा ‘गली बॉय’ पाहायला हवा.
झोया अख्तरचं दिग्दर्शन अप्रतिम झाल आहे’. ‘गलीबॉय’ साकारताना कुठेही केवळ ती एका मुलाची कथा रहात नाही तर ती अख्ख्या पिढीची गोष्ट होते. या चित्रपटाची कथा पक्की आहे. पटकथा तर इतकी नेमकी आहे की सिनेमाच्या सुरुवातीपासनं ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवते आणि संवादांची तर गोष्टच वेगळी. इतके सहज संवाद आहेत की चित्रपट कधी आपल्या मनात बोलका होतो ते कळतच नाही. या चित्रपटाचा गाभा म्हणजे त्याची संवेदनशीलता आणि ती फार सुंदर जपली आहे. त्याला साथ लाभलीय उत्तम कॅमेरावर्कची.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर रणवीर सिंहने कमाल केली आहे, त्याला याला कुठच्याही भूमिकेत बसवलं तरीही तो त्या भूमिकेचाच होतो. रणवीर सिंगने ही बेभान भूमिका इतकी संयतपणे साकारली आहे की काही क्षण स्वतःला विसरावं आणि मनापासनं त्या व्यक्तिरेखेच्या पेमात पडावं. आलिया भटचा अत्यंत सहज, मोकळा वावर तिच्या प्रेमातच पाडतो. तिचा पेहराव, देहबोली आणि आक्रमक, क्रांतीकारी वृत्ती यातली तफावत अक्षरशः अचंबित करते. एमसी शेर अर्थात सिद्धांत चतुर्वेदीही लक्षात राहतो. अनेक सीन्समध्ये रणवीरवर आलिया आणि सिद्धांत भारी पडलेले दिसतात. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे सिद्धांतकडे पाहून कळतं. विजय राज, अमृता सुभाष, कल्की कोचलीन, विजय मौर्या यांनी आपली कामे चोख बजावली आहेत.
रॅपरच्या आयुष्यावर सिनेमा म्हटल्यावर त्यात उत्तम गाणी आणि कविता असणार यात शंका नाही, ‘शंकर- एहसान- लॉय’ यांच्या संगीताने सिनेमाला चार चाँद लावले आहेत. अपना टाईम आयेगा या गाण्याने सिनेमाच्या रिलीजच्या आधीपासूनच तरुणांची मनं जिकंली आहेत. सिनेमाचे बॅकग्राऊंड स्कोर आणि विजुअल्स हॉलिवूडच्या तोडीचे आहेत.
थोडक्यात सांगायचे तर ‘कोई दुसरा अपुन को आके बोलेगा के मै क्या है… अपून भी कुछ है… अपुन की भी औकात है…असं ज्यांना वाटते त्या प्रत्येकाचा हा चित्रपट आहे.
चित्रपट – गलीबॉय
निर्मिती – रितेश सिधवानी, फरहान अख्तर
दिग्दर्शक- झोया अख्तर
संगीत – शंकर – एहसान – लॉय
कलाकार- रणवीर सिंह, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, विजय राज, अमृता सुभाष, कल्की कोचलिन, विजय मौर्या, ज्योती सुभाष
रेटिंग – ३.५
– भूपाल पंडित