‘दाद घेण्याचे भानही नृत्यसमाधीत असता कामा नये.’ हे शब्द आहेत प्रसिध्द अभिनेत्री, नृत्यांगना कै. अश्विनी एकबोटे यांचे. पुण्यात झालेल्या ‘नाट्य त्रिविधा’ या कार्यक्रमादरम्यान अश्विनी एकबोटे यांचे आकस्मित निधन झाले. या धक्क्याने मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी हेलावून गेली. त्यांची ती नृत्यसमाधी अखेरचीच ठरली.
या धक्क्यानंतर अश्विनी एकबोटे यांच्या शिष्यांनी ‘त्या साऱ्या’ हा ग्रुप तयार करत अश्विनी ताईच्या स्मरणार्थ नृत्यरूपी आदरांजली देणारा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून २२ मार्च, २०१६ रोजी अश्विनी एकबोटे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांना आदरांजली देण्याच्या उद्देशाने ‘अशी ही सजली बावनखणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि यानंतर दरवर्षी २२ मार्च रोजी ‘त्या साऱ्या’ आणि ‘भारतीय कला केंद्र’ यांच्या वतीने ‘अश्विनी एकबोटे’ यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी ‘अश्विनी एकबोटे’ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शास्त्रीय नृत्य क्षेत्रात सन्माननीय कामगिरी करणाऱ्या कलावंतास ‘नृत्य समाधी पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट. तो कायमच दुर्दैवी आणि दुःखद असतो परंतु कलाकारासाठी मात्र आपली कलाकृती साकारत असताना, आपल्या कलेच्या सानिध्यात, रंगमंचावर आयुष्याचा शेवट होणे यासारखा सुखद शेवट नाही. अश्विनीताई या अशाच कलावंतांपैकी एक! इहलोकवरचा प्रवास संपवून दुसऱ्या जगात प्रवेश करताना अश्विनीताईंना रंगमंचावर क्षणभर थबकल्यानंतर त्यांच्या नजरेसमोरून त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास कसा तरळला असेल याचे सादरीकरण या कार्यक्रमाद्वारे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन अश्विनी एकबोटे यांच्या शिष्य सुचेता जोशी यांचे असून या कार्यक्रमात त्यांच्याच शिष्या प्रसिद्ध नृत्यांगना सायली कानडे, मानसी वझे, प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे, अश्विनी कुलकर्णी तसेच इतर कलाकार सादरीकरण करणार आहेत. याप्रसंगी ‘अश्विनी एकबोटे’ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिला ‘नृत्य समाधी पुरस्कार’ कर्नाटकी संगीताचे प्रसिद्ध गायक श्री. शिवप्रसाद यांना दिला जाणार आहे.
सदर कार्यक्रम ‘भरत नाट्य मंदिर’ येथे २२ मार्च, २०१६ रोजी आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका एक तास आधी कार्यक्रमस्थळी उपलब्ध असणार आहेत.