महाराष्ट्रदिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात येत्या 1 मे रोजी श्रमदान करणार आहे. सई गेली तीन वर्ष पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पाणीटंचाईविरहित महाराष्ट्रासाठी आपलं योगदान देते आहे. यंदाही आपल्या बाकी सर्व व्यावसायिक जबाबदा-यांना बाजूला ठेवतं, सई श्रमदानामध्ये 1 मे रोजी सक्रिय सहभागी झालेली दिसणार आहे.
सई ताम्हणकरला ह्याविषयी विचारले असता ती म्हणते, “मी हे स्वानुभवाने सांगु शकते, की, रणरणत्या उन्हात श्रमदान करताना आपला घाम जेव्हा मातीत मिसळतो. तेव्हा मातीच्या येणा-या सुगंधाची बरोबरी कोणताही महागडा परफ्युम करू शकणार नाही. त्यामुळेच पाणी फाउंडेशन जेव्हा जेव्हा श्रमदानासारखे उपक्रम आयोजित करतं, तेव्हा त्यात सक्रिय सहभाग घेणं, ही माझ्यासाठी प्राथमिकता असते.”
तिच्या श्रमदानाच्या अनुभवाबद्दल सई सांगते “पाणी फाउंडेशनसाठी मी गेल्या तीन वर्षात पश्चिम महाराष्ट्र फिरले आहे. एकदा एक सरपंच मला हातात कुदळ-फावडा घेऊन काम करताना पाहून प्रतिक्रिया देत म्हणाले होते की, मी आजपर्यंत कुठल्याच हिरोइनला पाण्यासाठी आमच्या गावात येउन काम करताना पाहिलं नव्हतं. ह्या प्रतिक्रियेने माझा काम करण्याचा हुरूप अजूनच वाढला.”
ती पूढे म्हणते, “आपल्यात पध्दत आहे, ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणायची. जर आपल्या अन्नदात्याला, शेतक-याला खरंच सुखी करायचं असेल, तर सुरूवात श्रमदान करून त्याच्या शेतीला मुबलक पाणी पोहोचवण्यापासून करायला हवी.”