’मुंबई मेरी जान’ आणि ’डोंबिवली ’फास्ट’सारख्या वेगळ्या चित्रपटांमधून आपली छाप रसिकांच्या मनात कायम करणार्या निशिकांत कामत याचा आणखी एक थक्क करणारा चित्रपट म्हणजे ’दृश्यम’! एक थरार, रहस्यपट रसिकांसमोर यशस्वीपणे मांडण्यासाठी ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सगळ्यांचा वापर यामध्ये निशिकांतने योग्य रितीने केलेला दिसतो. अजय देवगण आणि तब्बू यांचा उत्कृष्ट अभिनय आणि त्याला सहकलाकारांनी दिलेली संयमी साथ हे या चित्रपटाचे खरे यश आहे. पाऊणे तीन तासाच्या कालावधीत चित्रपट रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवतो.
गोव्यातील एका छोट्याश्या गावात सहजसुंदर आयुष्य जगणार्या मध्यमवर्गीय साळगावकर कुटुंबाची हि कथा आहे. अचानक एकेदिवशी त्यांच्या आयुष्यात एक अनाकलनीय प्रसंग घडतो, त्यात अघटीत घडते आणि मग सुरु होतो कुटुंबाला वाचवण्याचा संघर्षमय परंतु तितकाच चालाख अन् शातीर प्रवास. या प्रवासाचा मुख्य सूत्रधार असतो चौथी पास विजय साळगावकर (अजय देवगण). चित्रपटातील नायकाला प्रतिस्पर्ध्याला नमवण्याची खुमखुमी नाही किंव्हा त्यांना हरवल्याचा गर्वही नाही… त्याला काळजी आहे ती केवळ आपल्या कुटुंबाची, त्यांच्या रक्षणाची… एकूणच हा थरारक प्रवास ‘दृश्य’स्वरूपात पाहिल्यास अधिक चांगला अनुभव येऊ शकतो. कारण ऐकू किंवा वाचनात येणार्या गोष्टींपेक्षा ‘दृश्य’स्वरूपातल्या गोष्टी कैकपटीने आपल्या जास्त काळ लक्षात राहतात.
अॅक्शन किंवा कॅमेडी हिरो म्हणून गेल्या काही वर्षात अजय देवगण आपल्या समोर येत असला तरी ‘दृश्यम’मधील त्याची व्यक्तिरेखा अतिशय वेगळी आहे. त्याच्या आजपर्यंतच्या सर्व प्रतिमा पुसून एक वेगळाच अजय आपल्यासमोर उभा करण्यात निशिकांत यशस्वी ठरला आहे, अर्थातच याचे श्रेय अजयलाही तितकेच द्यावे लागेल. असं म्हटलं जात की, अभिनेत्रींना काही ठराविक वर्षच चित्रपटसृष्टीत स्थान असतं. परंतु हे विधानही तब्बूने खोडून काढल आहे. वयाची चाळीसी ओलांडूनही ही अभिनेत्री आजही त्याच ताकदीने काम करते आणि रसिकांनाही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहावत नाही, हे विषेश!
हिंदी ‘दृश्यम’ व्यंकटेशच्या व कमाल हसनच्या तामीळ आणि मोहनलालच्या मल्याळम ‘दृश्यम’ चित्रपटावर आधारीत असला तरी नव्याने हा चित्रपट साकारणे, मांडणे आणि तेवढ्याच ताकदीने तो अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करणे ही सोपी गोष्ट नाही. खंत एकाच वाटते कि, तामीळ चित्रपटातील प्रत्येक सीन जशाच्या तसा हिंदीमध्ये घेण्यात आला आहे. निशिकांत कामतने इथे मात्र थोडीशी निराशा केली आहे. पण तरीही मांडणी, पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय या चारही पातळ्यांवर ‘दृश्यम’ सुपरहिट ठरणार. ऑगस्ट महिन्यापर्यंतचा या वर्षातील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच तुम्ही अजय देवगण किंवा निशिकांत कामत यांचे चाहते असाल तर १०० टक्के हा चित्रपट पाहा आणि चाहते नसाल तर मग १०१ टक्के हा चित्रपट पाहाच. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही या दोघांचेही चाहते व्हाल!
– प्रथमेश नारविलकर