धग ” या चित्रपटाला ऑस्करच्या पाश्चिमात्य प्रादेशिक भाषा चित्रपटाच्या नामावलीत समाविष्ट करण्यात आले आणि , महाराष्ट्राच्या शिरपेचात वैश्विक सन्मानाचा तुरा खोवला गेला, राष्ट्रीय पुरस्कार ते ऑस्कर चा प्रवास…. धग ने केला आणि मराठीतला एक दर्दभरा गीतकार रसिकांपुढे आला !!!जग जळतं,जळतं … राख होतं …. या गाण्याने आणि ‘ उधळले तुझ्यावर गाव , जिव्हारी … या वाडकरांच्या आवाजातील गाण्याने हा दर्द रसिकांच्या मनामनात जागविला . फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी “आणि आता येणाऱ्या “खैन्दुऴ” ने या संगीतकाराचे अष्टपैलू गुण रसिकांसमोर येणार आहेत
मराठी चित्रपटाच्या ह्या भरारीत आणि काफिल्यात , संगीत दिग्दर्शक म्हणून शामिल होणे हे माझ्यासारख्या सामान्य पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीसाठी एक वेगळे वळण होते असे नम्रपणे नमूद करणारा एक साधा आणि व्रतस्थ प्रतिभावान संगीतकार म्हणजे आदि रामचंद्र, पूर्ण नाव “आदित्य रामचंद्र पटाईत”, जन्म गाव : धर्माबाद , जिल्हा : नांदेड
वडील कै .रामचंद्र विनायकराव पटाईत, धर्माबाद येथील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते.पण उत्कृष्ठ गायक आणि सर्व संगीत प्रकारांची उत्तम जाण असलेल्या पटाईत सरांनी आपल्या मुलाला सांगीतिक वारसा देण्यात कुठलीही कसर सोडली नाही याचाच परिणाम आणि जवाबदारी म्हणून कि काय “आदि रामचंद्र” हे नाव आज राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादित जावून पोचले आहे.
असे संगीतकार आदि रामचंद्र याचे हे मनोगत :
संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला , लहान असतांनापासून सतत वडिलांनी सवाई गंधर्व महोत्सवास न्यायला सुरुवात केली ज्या योगे पं वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं भीमसेन जोशी , वडाळी बंधू , या सारख्या दिग्गज कलावंतांचे श्रवण संस्कार घडवून आणले ,
१ ९ ९ ४ या वर्षी वडिलांच्या अकाली निधना नंतर आम्ही धर्माबाद सोडले,आई श्रीमती सुधा रामचंद्र पटाईत यांचा कठीण परिस्थितीत भक्कम आधार, त्याला अनुकंपा धर्तीवर वडिलांच्या जागी नोकरी मिळत असतांना पण आईच्या आग्रहास्तव औरंगाबाद गाठले, सरस्वती भुवन कला महाविद्यालयात संगीत विभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला, तेथे पहिले गुरु पं शिवराम गोसावी गवसले. हळू हळू रियाझ वाढू लागला, पं शिवरामजींनी पं. नाथ नेरळकर यांचेकडे गायकी आणि नायकी च्या अभ्यासासाठी पाठवले, तेथे गुरुजी ८ तास रियाझ करून घ्यायचे , भरपूर मेहेनत घेतली, दरम्यान नाट्यशास्त्र विभागात अनेक नाटकांना त्याने संगीत दिले, शिव कदम या घनिष्ठ मित्राने दिग्दर्शित केलेल्या मोहन राकेश लिखित ” आषाढ का एक दिन”, महानिर्वाण, इडीयट, सये तुझे डोळे, चि.त्र्य. खानोलकरांच्या गूढ गर्भ कवितांवर आधारित “मी म्हणावे” अश्या अनेक नाटकांना संगीत देण्या -पाठोपाठ, नाट्यदर्पण या मुंबईतील गाजलेल्या एकांकिका स्पर्धेतील ” अरविंद जगताप” लीखित “शुक्राणू” या विजेत्या नाटकास पण संगीत दिले.
औरंगाबाद येथे स्वतंत्र गाण्याच्या मैफिलीना सुरुवात केली, १९९८ या वर्षी मुंबई गाठले, कुणाच्या हि शिफारशी विना सरळ सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना माझ्या चाली ऐकविल्या, त्यातून ” बेजुबान” या हिंदी अल्बम ची निर्मिती केली, आणि सुरेश वाडकरांच्या आवाजात १९९९ साली या अल्बमची रेकॉर्डिंग केली, तिथपासून सुरेश वाडकरांचा आशीर्वाद आणि सानिद्ध्य सतत लाभले, आदित्य च्या प्रतिभेवर फिदा असणारी अनेक दिग्गज व्यक्तीनी मला साथ दिली, घरच्या जीम्मेदारीमुळे १२ वर्षे नौकरीत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकापर्यंतचा प्रवास लीलया पेलवला, या नोकरीच्या प्रवासात नांदेडला २००५ ते २००८ या काळाtे कधी नांदेड कधी औरंगाबाद परिक्षेत्रात नौकरी सुरूच होती , महाराष्ट्र केबल न्यूज नेटवर्क चा संपादक सचिन अनर्थे या मित्राने अनेक जिंगल्स संगीतबद्ध करण्यास दिल्या, कठीण परिस्थितीशी दोन हात करत असतांना व नातेवाईकांची कुठली हि मदत नसतांना केवळ अशा वरिष्ठ मित्रांच्या भरघोस प्रतिसादाच्या जोरावर आज मार्गक्रमण सुरु आहे.
चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी घनिष्ट मित्र समीर रावसाहेब याने सतत प्रोत्साहन दिले, नौकरी सुरु असतांना माझा सृजनशीलतेचा दिवा तेवत ठेवला , त्याचा हा आग्रह होता कि माझे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात माझी उर्जा खर्च होऊ नये , आणि इतरही मित्रांचे असेच मत बनत गेले, मग एके दिवशी निर्णय घेतला , विभागीय व्यवस्थापक पदाची नौकरी सोडून २०१० या वर्षी पुण्यात स्थायिक झालो आणि मला “धग” या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून बोलावणे आले, गाणे संगीतबद्ध झाल्यानंतर निर्माते विशाल गवारे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी ते सुखविंदर सिंग या सुप्रसिद्ध हिंदी गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करावे असा सल्ला दिला, मी स्वतःच्या आवाजात जेंव्हा रेफरन्स रेकॉर्डिंग केले तेंव्हा अभिनेता उपेंद्र लिमये याच्या डोळ्यात पाणी तरळून आले, आणि असे ठरले कि माझाच आवाज हा योग्य आहे, आणि त्याचे डॉल्बी मिक्स माझ्याच आवाजात झाले, अशारितीने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पदार्पण आणि त्यात राष्ट्रीय पुरस्कार.
धग नंतर समीर रावसाहेब दिग्दर्शित ” जागरण” या मराठी चित्रपटाला मी संगीत दिले ज्यात ” हरिहरन” ” सुरेश वाडकर ” ” वैशाली सामंत” यांनी गाणी गायिली ,शिव कदम , प्रसन्ना देशमुख या गीतकारांना घेऊन त्याचा हा प्रवास सुरु आहे एवढेच नव्हे तर जागरण मधील एक गाणे गायिले आहे, www.dhingana.com वर ही गाणी डिजिटलि लॉंच केली गेली, आजवर या गाण्यांचे लाखांमध्ये डाउनलोडस आहेत.
यानंतर पुण्यात आर्चिस साउंडप्रो प्रा.लि. हा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडीओ थाटला, २०१३- २०१४ या कालखंडात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी ” या ध्वनिमुद्रीकेस संगीतबद्ध केले व या ध्वनिमुद्रीकेची निर्मिती सुद्धा केली.
तानाजी घाटगे दिग्दर्शित , अरविंद जगताप लिखित ” विनाकारण राजकारण” , आशिष पुजारी दिग्दर्शित ” अतिथी ” व “खैन्दुऴ” या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले,
“भगवा” या विवेक आपटे लिखित ऐतिहासिक नृत्य नाट्य अविष्कारात तब्बल १२ गाणी संगीतबद्ध केली
आज गुगल सर्च वर आदि रामचंद्र असे टाईप केले कि त्याची कारकीर्द आपल्याला दिसून येते.
त्यात ऑस्कर साठी नामांकन म्हणजे उत्तुंग भरारीच आहे
त्याला त्याच्या ह्या यशाबद्दल विचारले असता तो ” अजून खूप काम करायचे आहे, ज्यासाठी जन्म झालाय त्या भूमिकेस न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहेत ” अशी प्रांजळ प्रतिक्रिया द्यायला विसरत नाही.