ठाणे : मराठी नाटक आणि चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “एका निर्मात्याने मला तीन महिने ‘कैद’मध्ये ठेवलं होतं. मात्र दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर माझी सुटका झाली,” असा दावा सुप्रिया यांनी केला आहे.
ठाण्यात आयोजित केलेल्या ‘महिला सुरक्षा परिसंवाद’ला संबोधित करताना सुप्रिया पाठारे यांनी हा आरोप केला. “1995 मध्ये एक निर्माता सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथे तीन महिने ‘कैद’ केलं,” असं पाठारे यांनी सांगितलं. मात्र त्यांनी निर्मात्याचं नाव आणि घटनास्थळाचा नेमका पत्ता याचा खुलासा केला नाही.सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं की, “शूटिंसाठी मी इथली एकटीच होते. पुढील तीन महिने निर्मात्याने बंदुकीच्या धाकावर माझ्याकडून अभिनय करवून घेतला. मला तिथल्याच परिसरात डांबलं होतं. मात्र माझ्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधण्याची परवानी त्याने दिली होती.””मराठीत बोलू नको, असा दम निर्माता देत असे. पण मी कसंतरी बहिणीला गुप्त भाषेत माझ्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मुंबईत असलेल्या माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुखांकडे मदतीची विनंती केली. यानंतर बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.””एक दिवस राजस्थान पोलिसांतील 50 शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की बाळासाहेबांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. 20 तासांचा प्रवास करुन मी सुरतला पोहोचले आणि यावेळी माझ्याकडे अवघे 12 रुपये शिल्लक राहिले होते. पण सुखरुप सुटकेसाठी मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन,” असं सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं.