अभिनेते नाना पाटेकरांच्या गहिवरल्या आवाजात उद्गारलेल्या ‘जगावं की मरावं… हा एकच सवाल’ या संवादाने उपस्थित मान्यवर आणि नाशिककरांना अश्रू अनावर झाले होते. निमित्त होतं ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या मुहूर्ताचं. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या अलौकिक प्रतिभेनं विस्तारलेलं मराठीतील एकमेवाद्वितीय नाटक म्हणजेच ‘नटसम्राट’ला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत चित्रपटरुपी माध्यमांतराने दिलेली ही अनोखी मानवंदनाच ठरली. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानात रंगलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते सुनील बर्वे, अभिनेत्री मेधा मांजरेकर, नेहा पेंडसे, संगीतकार अजित परब, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि सल्लागार हेमंत टकले उपस्थित होते. फिनक्राफ्ट मिडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट प्रस्तुत विश्वास विनायक जोशी, नाना गजानन पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट लवकरच रसिक-प्रेक्षकांकरिता घेऊन येत आहेत. जबरदस्त संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या ‘नटसम्राट’ने मराठी नाट्यसृष्टीत एक अनोखी उंची गाठली आहे. डॉ श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक प्रतिभावंतांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर गणपतराव बेलवलकरांची भूमिका जगलीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘नटसम्राट’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे. अष्टपैलू कलावंत नाना पाटेकरांच्या अभिनयाद्वारे ७०च्या दशकातील गणपतराव बेलवलकर हे पात्रं पुनरुज्जीवीत होणार आहे. नाना पाटेकरांची प्रथम निर्मिती असलेल्या ‘नटसम्राट’ विषयी बोलताना आपल्या जुन्या ऋणानुबंधांच्या आठवणी सांगितल्या. “१९७० मध्ये ‘नटसम्राट’ नाटक रंगमंचावर आलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो पण त्याचवेळी हे नाटक एक मापदंड म्हणून मान्यता पावलेलं होतं. त्यावेळी डॉ श्रीराम लागू, दत्ता भट यांनी साकारलेल्या भूमिका काळजात रुतून बसल्या होत्या. नटसम्राट करायला मिळेल असं माझ्यातल्या नटाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आत्ता आप्पासाहेब बेलवलकर यांची अजरामर भूमिका खुणावत असतानाच महेश मांजरेकरांनी ही संधी मला दिली. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे.” असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. ‘कुणी घर देतं का घर’ असे थेट विचारत प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे ‘नटसम्राट’ गणपतराव उर्फ आप्पासाहेब बेलवलकर या पात्राने ७० चा दशक खऱ्या अर्थाने गाजवला. दशकं लोटली पण या नाटकाचे नावीन्य अजूनही ओसरलेले नाही हीच बाब दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी नेमकी हेरली. “मराठी साहित्यविश्व आणि रंगभूमीवर दबदबा निर्माण करणारी ‘नटसम्राट’ ही अजोड कलाकृती असून त्यावर चित्रपट काढणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. कुसुमाग्रजांनी मांडलेली एका नटसम्राटाची कैफियत चित्रपटात मांडणं कठीण आहे. माध्यमांतर करताना मूळ नाटक आणि संहितेला धक्का न लागता ‘नटसम्राट’ चित्रपटात रुपांतरीत करण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आहे.” असे मत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या या जबरदस्त संहितेची भुरळ कोणाला पडली नसती तरच नवल. ही संधी लेखक किरण यज्ञोपवित यांना लाभली असून त्यांनी ‘नटसम्राट’चे संवाद लिहिले आहेत.आपल्या दर्जेदार अभिनयाने अजरामर केलेल्या ‘नटसम्राट’ नाटकातील भूमिकांना न्याय देण्याकरिता तितक्याच तोडीचे मातब्बर कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नाना पाटेकर, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, रीमा, सुनील बर्वे, नेहा पेंडसे यांसारखे दिग्गज पहिल्यांदाच नटसम्राटच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत. ‘नटसम्राट’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंटचे अनिरुद्ध देशपांडे यांची मोलाची मदत लाभली आहे. To Be or Not To Be’, ‘जगावं की मरावं’, ‘कुणी घर देतं का घर…?’ असे काळजाला हात घालणारे संवाद, टाळ्यांचा गजर, साश्रू नयनांनी ‘नटसम्राट’ला रसिकांनी दिलेली मानवंदना लवकरच रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘नटसम्राट’च्या चित्रीकरणाला येत्या ४ मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार आहे.