मुंबईतील भायखळ्यातील ‘दगडी चाळीवर’ चित्रपट करणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. एका जीवंत व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट करणे व त्या चाळीतील व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर उतरवणे हा माझ्या आयुष्यातील म्ह्त्वाचा टप्पा होता. असे सांगतायेत दिग्दर्शक चंद्रकांत कणसे………..
करिअरची सुरवात कशी केली.
मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मी शाळेत असताना शाळेतील बालनाट्यात आवडीने भाग घेत असे माझ्या करिअरची सुरवात शालेय नाटकापासून केली त्या नंतर मी टेलिव्हिजन मधून अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत आलो. अभिनेता म्हणून मी माझ्या करिअरमध्ये खूप चढ – उतार पाहिले. ‘सर आले धावून’, यदा कदाचीत, ‘आता होवून जाऊ द्या’ ही माझी नाटके विशेष लक्षात राहण्यासारखी. त्या बरोबर टी.व्ही. वरती मी सह – दिग्दर्शक म्हणून गंगुबाई नॉन मेट्रिक ही माझी मालिका तर दिग्दर्शन म्हणून ‘अजून ही चांद रात आहे’, १७६० सासूबाई, ‘आभास हा’ या मालिका टेलिव्हिजन वरती केल्या. माझ्या जीवनात संजय जाधव व राजेश देशपांडे या दोन व्यक्तींचे खूप मोठे स्थान असून ते माझे गुरु आहेत.
‘दगडी चाळ ’ चित्रपट दिग्दर्शनासाठी कसा मिळाला.
अभिनया बरोबरच मी सह – दिग्दर्शक म्हणून माझ्या करिअरला सुरवात केली. मी संजय जाधव यांच्या सोबत फक्त लढ म्हणा, रिंगा रिंगा, दुनियादारी, प्यार वाली लव्ह स्टोरी असे चित्रपट केले. तसेच अंकुश चौधरी बरोबर ‘झक्कास’ हा चित्रपट केला होता. माझे काम पाहून अंकुश चौधरी याने माझे दिग्दर्शक म्हणून ‘दगडी चाळ’ ला नाव सुचवले आणि मला हा चित्रपट मिळाला.
तुमच्या चित्रपटाविषयी सांगा.
‘दगडी चाळ’ हा चित्रपट १९९५ – ९६ च्या गँग वॉरवरती भाष्य करणारा असला तरी या चित्रपटात छानसी लव्हस्टोरी असून एक चांगली कथा आहे. एका चाळीतील सामान्य कुटुंबातील तरुण काही कारणामुळे तो गुन्हेगारी क्षेत्राकडे ओळला जातो. त्यांनतर त्याच्या जीवनात झालेले बद्दल, त्याच्या जीवनात हळूवारपणे आलेले प्रेम त्यातून फुललेली प्रेम कथा या गोष्टीवर या चित्रपटाचे कथानक बेतले आहे. या चित्रपटात दिग्ग्ज कलाकारांची फौज आपणास पहावयास मिळेल. या चित्रपटात दोन गीते असून एक गणपती तर दुसरे प्रेम गीत आहे
तुमच्या चित्रपटाच्या कलाकार व तांत्रिक टीम विषयी सांगा.
या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, संजय खापरे, कमलेश सावंत व पूजा सावंत असे दिग्ग्ज कलाकार यात असून या चित्रपटात छायाचित्रण अनिकेत खंडागळे, कला दिग्दर्शक – मनोहर पाटील, संगीत – अमितराज, गीते – मंदार चोळकर, चित्रपटाचे लेखन – अजय ताम्हणे व प्रविण कमळे यांचे आहे तर साईपूजा फिल्म एन्ड एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि सुरेश सावंत व अमोल काळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित करण्यात येईल. असे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितले.