चित्रपटांसारख्या माध्यमातून भारत आणि अल्जेरिया मैत्रीसंबंध वृद्धिंगत होतील — समीद मोहम्मद आदिलर
पुणे
” भारत आणि अल्जेरिया यांचे मैत्रीसंबंध चांगले आहेतच मात्र चित्रपटांसारख्या आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हे मैत्रीपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत होतील अशी आशा अल्जेरियाच्या वकिलातीमधील मंत्री समीद मोहम्मद आदिलर यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अल्जेरियाचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, त्यानिमित्त समीद मोहम्मद आदिलर पुण्यात आले असून पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अल्जेरियामध्ये चित्रपटसृष्टी आता चांगली प्रगत झाली असून त्याचा आविष्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसत आहे. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. याप्रसंगी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील निवड समितीचे सदस्य समर नखाते हेही उपस्थित होते.
प्रारंभी फ्रेंच वसाहतीपैकी एक असलेला अल्जेरिया हा देश १९६२ साली स्वतंत्र झाला अशी माहिती देऊन समीद मोहम्मद पुढे म्हणाले. तेथील नागरिकांमध्ये भारतीय चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असते. यासंदर्भात त्यांनी ‘मदर इंडिया’, ‘आन’ या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करून दिलीप कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर आदी कलावंत तसेच लता मंगेशकर. आशा भोसले, मोहम्मद रफी हे गायक-गायिका अल्जेरियामध्ये खूप लोकप्रिय असल्याचे सांगितले. शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ”आ गले लग जा’ हा चित्रपट आपणास खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अल्जेरियन नागरिक संगीताचे मोठे भोक्ते असून तेथील संगीतामध्ये तबला,आदी भारतीय वाद्यांचा सर्रास वापर केला जातो अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या पहिल्याच भेटीत पुणे शहर आवडल्याचे त्यांनी यावेळी प्रशस्तीपत्रही दिले तसेच पुढील वर्षी अल्जेरियामधील प्रमुख लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त पुण्यात आणले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.