‘ख्वाडा’ मध्ये एका धनगर कुटुंबाची वास्तवदर्शी कथा — भाऊराव खराडे
पुणे
” चित्रपट तयार करण्याचे कसलेही ज्ञान नव्हते मात्र चित्रपट करण्याची मनापासून इच्छा होती त्यामुळेच अनेक अडचणीवर मात करून ‘ख्वाडा’ सारखा चित्रपट निर्माण केला आणि तो पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला जातोय याचे खूप समाधान वाटतेय अशा शब्दात ‘ख्वाडा’ चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक भाऊराव खराडे यांनी आपल्या भावना रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. नेहमीच स्थलांतरित जीवन जगणाऱ्या एका धनगर कुटुंबाची वास्तवदर्शी कथा ‘ख्वाडा’ मध्ये चित्रित करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी स्पर्धात्मक विभागात ‘ख्वाडा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना दिग्दर्शक भाऊराव खराडे पुढे म्हणाले की, माझ्या घरात साधा टीव्ही ही नव्हता मात्र चित्रपट पाहण्याची आणि तो तयार करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी पदवी मिळविण्यापासून तयारी केली व आवश्यक ते प्रशिक्षण घेवून अतिशय प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देवून हा चित्रपट तयार केला. चित्रपट तयार होत असताना आलेल्या अडचणींही यावेळी त्यांनी कथन केल्या मात्र कलाकारांमध्ये जिद्द असली तर तो काय करू शकतो याचे आदर्श उदाहरणही त्यांनी सर्वांसमोर ठेवले. याप्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलावंत अभिनेते शशांक शेंडे, भाऊसाहेब शिंदे, चंद्रकांत धुमाळ, छायालेखक वीरधवल पाटील तसेच निर्माते चंद्रकांत राऊत आदी उपस्थित होते. प्रारंभी लेखक व पत्रकार राज काझी यांनी ख्वाडा’ च्या टीमचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.
अभिनेते शशांक शेंडे यांनी याप्रसंगी, ‘ख्वाडा’ चे अनुभव सांगताना दिग्दर्शक भाऊराव खराडे यांच्या जिद्दीचे कौतुक केले. या कथेतील अनेक शब्द आपल्याला माहित नव्हते मात्र चित्रपटाची वास्तवता जपण्यासाठी खराडे यांनी त्याचाच आग्रह धरला आणि प्रत्येक कलाकारांकडून ते अनेकवेळा वदवून घेतले. वास्तवता हेच या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट आहे असेही त्यांनी सांगितले. तर छायालेखक वीरधवल पाटील यांनी या चित्रपटामुळे आपले फार मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.