आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर काळ कोणता ? हा प्रश्न येताच ‘बालपण’ हे उत्तर तसं अपेक्षितच असतं आणि या बालपणातही सर्वात रम्य आठवणी असतात त्या शाळेच्या, मित्रांच्या आणि आईने पुरवलेल्या लाडाच्या. बालपणात मनसोक्त हुंदडताना, मित्रांसोबत खेळताना अनेक निर्जिव गोष्टीही आपल्या जगण्याचा भाग बनलेल्या असतात. कधी ते एखादं खेळणं असतं, कधी क्रिकेटची बॅट, पेन, पुस्तक, वही, कधी सायकल तर कधी असं एखादं ठिकाण ज्यामधे आपलं मन पूर्ण गुंतलेलं असतं. अशा गोष्टी आपल्या मनात कायम घर करून राहतात,ज्यांच्यापासून आपण दुरावलो तरी त्याच्या आठवणी जपत आपलं मन कायम त्याकडे ओढलं जातं. कारण अनेकदा आपलं आयुष्यच बदलवून टाकणा-या या गोष्टी आपल्या जगण्याची जणू शिदोरीच बनतात. अशाच काही मित्रांची, शाळेची, आईच्या प्रेमाची आणि मनात घर केलेल्या ठिकाणाची गोष्ट सांगणारा ‘किल्ला’ हा चित्रपट येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एमआर फिल्मवर्क्स, जार पिक्चर्स आणि एस्सेल व्हिजन प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अविनाश अरूण यांनी. ‘फॅंड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ सारखे वेगळ्या पठडीतले चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनची ही नवी निर्मिती आहे.
‘किल्ला’ ची कथा आहे चिन्मय उर्फ चिनूची. आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून कोकणात आलेल्या चिनूला नवी जागा आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेणं अवघड जातंय ज्यामुळे त्याचं एकाकीपण वाढतंय. अशातच त्याची मैत्री शाळेतील काही उनाड मुलांशी होते. ‘बॅक बेंचर्स’ असलेल्या या मुलांचं स्वतःचं असं वेगळं विश्व आहे ज्यामध्ये चिनूही नकळत सामील होतो. शाळेत चालणारी धम्माल मजा मस्ती आणि शाळेबाहेरही फुलत जाणा-या या मैत्रीने चिनूचंही मन तिथे रमायला लागतं. या सर्व वातावरणाशी नुकतंच जुळवून घेत असतांना एक अशी घटना घडते की चिनू परत एकटेपणाच्या कोशात हरवून जातो पण इथूनच त्याचा स्वतःला शोधण्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. जवळच्या लोकांपासून दुरावलेल्या चिनूचा स्वतःच्या शोधाचा हा प्रवास त्याला अधिक प्रगल्भ बनवून जातो. त्याच्या याच प्रवासाची कथा म्हणजे ‘किल्ला’ हा चित्रपट.
यावर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आणि रजत कमलावर आपलं नाव कोरणा-या ‘किल्ला’ या चित्रपटाने बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासहित अनेक ठिकाणी मानाचे पुरस्कार पटकावले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मानाचा ‘संत तुकाराम पुरस्कारही’ किल्लाला मिळाला शिवाय ‘झी चित्र गौरव’ पुरस्कारामध्ये तब्बल पाच पुरस्कारांवर ‘किल्ला’ने आपलं नाव कोरलं.
‘किल्ला’ या चित्रपटात चिनूची भूमिका केलीये अर्चित देवधरने तर आईच्या भूमिकेत आहे अमृता सुभाष. याशिवाय त्याच्या मित्राच्या भूमिकेत पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी हे बालकलाकार आहेत. यातील बंड्याच्या भूमिकेसाठी पार्थ भालेरावला यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांत उल्लेखनीय कामगिरीच्या प्रमाणपत्रानेही सन्मानित करण्यात आलं होतं. कोकणातलं सौंदर्य आपल्या छायाचित्रणातून टिपलंय अविनाश अरूणने. चित्रपटाची कथा अविनाशचीच असून पटकथा तुषार परांजपेची आहे तर संवाद उपेंद्र शिधयेंनी लिहिले आहेत. संकलन चारूश्री रॉयचं असून कला दिग्दर्शन प्रशांत बिडकर यांचं आहे.
लहान मुलांचं भावविश्व अतिशय तरल आणि संयत पद्धतीने केवळ मांडणाराच नव्हे तर त्या भावविश्वात आपल्याला अलगदपणे डोकायला लावणारा हा चित्रपट येत्या २६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मधुकर मुसळे (एमआर पिक्चर्स), अजय राय आणि अॅलन मॅक्लेक्स (जार पिक्चर्स), नितिन केणी आणि निखिल साने (एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स) यांची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळी अनुभुती देणारा ठरणार आहे.