मुंबई – उच्चतम निर्मितीमूल्ये, मोठी स्टारकास्ट, चकचकीत लोकेशन्स, बडे संगीतकार आणि आयटम सॉंग यांच्या जोरावर मराठी सिनेमा “मोठा” आणि “बॉक्स ऑफिस”वर गल्ला कमवतो असा समज आहे, किंबहुना अशा चित्रपटांना मिडीया “हाईप” देखील करत असतो. परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात तशाच फिल्म इंडस्ट्रीत असे काही फिल्ममेकर्स आहेत, जे चित्रपटाला समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम समजून, सामाजिक जाणीव व सामाजिक समस्यांना प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करतात, डी.एस.फिल्म्स निर्मित (दिलीप शहा), ऋषीराज क्रिएशन कृत, राजेंद्र साळी लिखित आणि राजेंद्र साळी व दत्ता गायकर दिग्दर्शित “आर्त” या मराठी चित्रपटातून अशाच एका देशव्यापी आदिवासी जात- पंचायत रूढी परंपरेबाबत भाष्य करण्यात आले आहे.
नुकताच या चित्रपटाला कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा” पुरस्कार मिळाला आहे.
शीतल साळुंके, संतोष मयेकर, गणेश यादव, जयराज नायर आणि अजित भगत यात प्रमुख भूमिकेत आहेत, याबाबत दिग्दर्शक राजेंद्र साळी याबाबत सांगतात की, गेली दिड ते दोन वर्ष मी महाराष्ट्र (कसारा, कर्जत, नंदुरबार). गुजराथ, कर्नाटक च्या ग्रामीण भागाचा सखोल अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की. आज भारतात महानगरांमध्ये महिला प्रगतीपथावर दिसते आहे, परंतु ग्रामीण भारतात आजही तिला जात पंचायत रूढी मुळे अन्याय सहन करावा लागतो आहे, इतक्या जाचक आणि ह्र्द्यद्रावक शिक्षा मी तिकडे ऐकल्या आहेत की, त्या कल्पनेने देखील अंगावर शहारे येतात. आमच्या “आर्त” चित्रपटातून अशाच महिलेंचा आतला आवाज मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, नुकतेच लोकसभेत “सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा” (जात पंचायतच्या जाचक रूढी विरोधात) निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचे आम्ही समर्थन करत आहोत. लवकरच या चित्रपटाचा विशेष खेळ (इंग्रजी सबटायटल सह) आम्ही विशेष लोकसभा सदस्यांसाठी आयोजित करणार आहोत, जेणे करून “आर्त”चा आवाज लोकसभेपर्यंत पोहचू शकेल.