पुणे,
” चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मला नाट्यसृष्टीचीही पार्श्वभूमी नव्हती. महाविद्यालयात तर मी ‘नटखट’ विद्यार्थी म्हणून मशहूर होतो मात्र काहीतरी करून दाखवायचे ही जिद्द होती शिवाय त्यावेळी मी प्रसिद्ध अभिनेते ‘राज कपूर यांचा ‘दिवाना’ होतो त्यामुळे मी पुण्यातील फिल्म इंन्सिट्युटमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलो आणि संघर्ष करीत करीत आजपर्यंत चित्रपटसृष्टीत उभा आहे ” या शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या जीवनप्रवास उलगडून दाखविला. विशेष म्हणजे ‘कालीचरण’ चित्रपटाद्वारे शत्रुघ्न सिंहा यांना चित्रपटसृष्टीत ‘नायक’ म्हणून ब्रेक देणारे प्रसिद्ध निर्माते सुभाष घई हेही याप्रसंगी उपस्थित होते त्यांनीही अधूनमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुवारपासून सुरु झालेल्या तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पिफ विशेष गौरव सन्मान २०१५’ प्रदान करण्यात आला त्यानिमित्त आज (शुक्रवारी) पत्रकारांशी वार्तालाप करताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या जीवन प्रवासाची अनेक वैशिष्ठ्ये सांगितली. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.
पुण्यातील फिल्म इंन्सिट्युटमध्ये प्रशिक्षण घेत असताना मला बरेच काही शिकायला मिळाले असे सांगून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, त्यामुळेच मी माझा गौरव पुरस्कार फिल्म इंन्सिट्युटला अर्पण केला आहे . फिल्म इंन्सिट्युटमध्ये प्रशिक्षण घेत असताना माझा आवाज आजच्यासारखा खर्जातील नव्हता मात्र मी प्रयत्न करून माझ्या आवाजात सुधारणा केली जेणेकरून नंतर माझा ‘आवाज’ हेच माझ्या कामाचे एक वैशिष्ठ्य बनले. कलाकाराजवळ नुसती बुद्धिमत्ता असून चालत नाही त्यासाठी प्रशिक्षणही आवश्यक असते आणि ते मिळाल्यानंतर आणखी सुधारणा होण्यासाठी ‘रियाज’ही महत्वाचा असतो असे त्यांनी सांगितले. कलाकाराला मिळालेली भूमिका आणि त्या भूमिकेसाठी त्या कलाकाराने घेतलेले परिश्रम याचा योग्य मिलाफ झाला तरच तो कलाकार यशस्वी होऊ शकतो असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. स्वत:ला कलाकार म्हणून सिद्ध करताना सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा किंवा स्वत:चे वेगळेपण तरी जपा असाही कानमंत्र त्यांनी यावेळी नवोदित कलाकारांना दिला.
नेता आणि अभिनेता यांच्यातील फरक विशद करताना ते म्हणाले चित्रपटसृष्टीत ‘ग्लैमर’ आहे तर राजकारणात ‘पॉवर’ (सत्ता) आहे. आपल्या हातून सामान्य जनतेचे भले यावे या शुद्ध हेतूनेच आपण राजकारणात आलो असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कोर्पोरेशन चे चेअरमन असताना आपण तेथील चित्रपटसृष्टीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कसे प्रयत्न केले याचीही त्यांनी माहिती दिली. तर चित्रपटसृष्टीला ‘इंडस्ट्रीज’चा दर्जा देण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी फार मोलाची मदत केली अशी पावती सुभाष घई यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सुभाष घई यांनी ‘कालीचरण’ चित्रपटामागच्या अनेक गोष्टी सांगून शत्रुघ्न सिन्हा दोन-तीन पानांच्या ‘डॉयलौग डिलीव्हीरीतही’ कसे तरबेज होते व ते त्यासाठी कसे परिश्रम घ्यायचे याची आठवण सांगितली.