कौशल्य विकास हाच यशाचा खरा मार्ग – दिलीप छाब्रिया
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचा पदविकाप्रदान समारंभ संपन्न
पुणे : कौशल्य विकास हाच यशाचा खरा मार्ग असून होण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंगीकार केल्यामुळे करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत असे मत डी. सी. डिझाईनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व यशस्वी इन्स्टिटूयट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त राबविण्यात असलेल्या शिका व कमवा योजनेतील डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या पदविका प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष कंपनीत काम करण्याच्या अनुभवामुळे कौशल्यात आणि ज्ञानात भरीव वाढ होते व त्यातून आत्मविश्वास निर्माण होतो. कमवा योजनेतील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे अन्य कुठल्याही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या तुलनेत जास्त रोजगारक्षम झालेले असतात आणि त्यांच्यातील वाढलेल्या आत्मविश्वासामुळे त्यांना स्वतःचे करिअर सुद्धा उत्कृष्ट घडविता येते.जगाच्या तुलनेत आजही भारतामध्ये वाहनांची वापरक्षमता कमी असून ती वाढण्याच्या दृष्टीने सर क्षेत्रातून प्रयत्न सूरु असून यामुळे नजीकच्या भविष्यात ऑटोमोबाईल क्षेत्राची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि या क्षेत्रात रोजगाराच्या संधीसुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही छाब्रिया यांनी सांगितले.
या पदविका प्रदान सोहळ्याप्रसंगी बोलताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या संचालक डॉ. सुनंदा मोरे यांनी सांगितले की, आज खर्या अर्थाने मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल होत असल्याचे पाहून भारावून आले, ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे मुक्त विद्यापीठाचे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष अस्तित्वात आल्याचे दिसत आहे, आपल्या मनोगतात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मुक्त विद्यापीठ अशा प्रकारचे अन्य उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या ३५० विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात पदविका प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी समाधान पाटील व सचिन खोडदे या विद्यार्थ्यानीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारा ‘यशोगाथा’ विशेषांक व ‘यशोमंथन’ हे संशोधन पत्रिकेचे (रिसर्च जनरल) प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘यशोत्सव’ अंतर्गत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक मल्हार करवंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक संजय छत्रे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस,संचालक अजय रांजणे, संचालक स्मिता धुमाळ, संचालक मकरंद कुलकर्णी, संस्थेच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. सुनीता पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग, पर्यवेक्षक,शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रियांका साळूंके, उर्मिला सातपुते, अनन्या नाईक श्वेता साळी,सौमेन पात्रामी,विजय मुळीक, शाम वायचळ, प्रथमेश पाटील, पवन शर्मा, अभिजत चव्हाण आदींनी विशेष सहकार्य केले.