पिंपरी- शंभरपेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे, राज्य शासनाच्या या प्रस्तावित विधेयकाचा राष्ट्रीय श्रमिक आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीने आज (गुरुवार) तीव्र निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे कार्यकर्ते दिलीप गावडे, दीपक अमोलिक, अरविंद भिलारे, कामगार नेते आणि 500 ते 600 कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यशासनाच्या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाळून त्याची होळी करण्यात आली.
यावेळी यशवंत भोसले म्हणाले की, राज्य शासनाने घेतलेला निर्णय म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारा तसेच कामगारांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे. घरातील कार्यक्रमांना पोलिसांची परवानगी आवश्यक नसली तरी लग्नसमारंभ, वाढदिवस, पन्नाशी, सोसायटींमधील कार्यक्रम हे सगळे घरात करता येणारे कार्यक्रम नाही तर या प्रत्येक कार्यक्रमांना पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करणे हे चूकीचे आहे. वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा मसुदा आहे. त्यामुळे आपले सरकार लोकशाही दडपून हुकुशाहीकडे झुकत चालले आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी घटनेतून आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिले ते स्वातंत्र्य सध्याचे सरकार हिरावून घेत आहे, यामधून घटनेचीही पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे जनतेवर होणा-या अन्यायाविरुधात जनतेने एकत्र येऊन आवाज उठवू नये, यासाठी हा मसूदा तयार केला जात असल्याचेही यशवंतभाऊ भोसले म्हणाले.