पुणे : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणी प्रक्रियेत जिल्हा समन्वयकांची भूमिका ही खूप जबाबदारीची व महत्वाची असल्याने सर्व जिल्हा समन्वयकांनी आपापल्या कामाच्या प्रक्रियेत अंतिमतःलाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत खूप संयमीपणे व चिकाटीने प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ते आज पुण्यात ‘यशस्वी’ संस्थेच्या सभागृहात झालेल्या जिल्हा समन्वयकांच्या एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्हा जिल्हा समन्वयकांनी हाताळण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्रपणे तपशीलवार नोंद ठेवून प्रकरण मंजूर किंवा नामंजूर होईपर्यंतच्या
टप्प्यातील सर्व घटनाक्रमाची नोंद ठेवावी, जेणेकरून एखादे कर्ज प्रकरण नेमके कोणत्या कारणामुळे पूर्ण होऊ शकले नाही याची माहिती आपल्याला सर्व समन्वयकांना पाठविता येईल. त्यामुळे प्रकरण स्वीकारण्यापूर्वीच संभाव्य अडचणी समजून घेता येतील आणि असे केल्याने योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत महामंडळाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविणे शक्य होईल असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
याप्रांसगी बोलताना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी करताना सांगितले कि, महामंडळाच्या योजना लाभार्थ्यांना पोहोचविताना सादर करण्यात येणाऱ्या विविध कागदपत्रांचे महत्व, कागपत्रे पडताळणी, बँकेकडे प्रकरण सादर करतानाची प्रक्रिया, लाभार्थ्यांसाठीचे निकष आदिंबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही जिल्हा समन्वयकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर समारोप सत्रात सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनीही आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून काम करत असताना कामाप्रती निष्ठा बाळगत आणि ध्येयप्रेरित व संघटन कौशल्याचा वापर करत काम करावे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, महामंडळाचे पदाधिकारी आकाश मोरे,सोमनाथ आहेर, जिल्हा समन्वयक प्रमुख श्रीकांत तिकोने व राज्यातील सर्व जिल्हा समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रसाद शाळीग्राम, प्रथमेश पाटील आदींनी विशेष सहकार्य केले.