मुंबई-शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक आहेत आणि ते आमच्यासोबतच राहतील कुठेही जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपाला अहंकार नडला अशी टीका पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केली. मात्र आम्ही अहंकारी नाही आम्ही जमिनीला धरून असलेली माणसं आहोत असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेने तुमची साथ सोडली तर तुम्ही राज्यात काय कराल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेना आमची साथ सोडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे नखरे पाहून तर ते तुम्हाला साथ देतील असे वाटत नाही असे मुलाखतकाराने विचारताच शिवसेनेचे नखरे जे तुम्हाला दिसतात तसे नाहीत आम्हाला सगळे नखरे ठाऊक आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सामनामधील अग्रलेखांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. सामनातले अग्रलेख वाचले तर वाटते की युती होणे अशक्य आहे यावर तुम्ही काय म्हणाल असे विचारताच, अहो म्हणूनच मी सामना वाचत नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातला कलगीतुरा कायमच रंगलेला असतो. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. असे असले तरीही आम्हाला त्यांचे सगळे नखरे ठाऊक आहेत ते आमची साथ सोडणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच राज्यांमधील निवडणुकांबाबत विचारण्यात आले. त्यावेळी या निवडणुकांच्या निकालांवरून लोकसभेचा अंदाज बांधू नका लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राहुल गांधी विरोधकांचे नेतृत्त्व करत आहेत हे चांगलं आहे, पुढची दहा वर्षे तरी त्यांना विरोधातच बसायचे आहे असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत.