कोपर्डी घटनेवरुन मराठा आणि दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ..आ. विनायकराव मेटे यांचा आरोप ( पुणे मनपा निवडणूक शिवसंग्राम लढविणार)
पुणे : कोपर्डी घटनेबद्दल राज्यभरात मराठा समाजामध्ये असंतोष पसरला आहे. ती अस्वस्थता राज्यभर विविध ठिकाणी मोर्चे काढून व्यक्त होत आहे. सगळ्या मोर्चांमध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना नाही, तर सगळा मराठा वर्ग एकवटला आहे. परंतु काही नेते मंडळी आणि माध्यमे हे मोर्चे दलित समाजाविरोधातील आहेत, असे चित्र रंगविण्याचे काम करीत आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक तरतुदी रद्द करुन कायद्यात सुधारणा व्हावी आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी, हीच मराठा समाजाची मागणी आहे. त्यामुळे कोपर्डी घटनेबद्दल होणा-या मोर्चांविषयीच्या चुकीच्या चर्चेमधून मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, संपर्क प्रमुख तुषार काकडे, महेंद्र कडू, किरण ओहोळ, शैलेश सरकटे, शिवराज मोटे, सविता आंबेकर, चेतन भालेकर, गिरीष पवळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल शासनाने अभ्यास करुन केंद्र सरकारला शिफारस पाठवून जाचक अटी कमी कराव्या, असे सांगत अॅट्रॉसिटी अंतर्गत नोंदविलेल्या ९५ टक्के खटल्यांमध्ये बहुतांश जणांची निर्दोष सुटका होते. कायद्यामध्ये अटकपूर्व जामिन अर्ज करता न येण्याची जाचक तरतूद आहे. ती तरतूद चुकीची असून शहानिशा केल्याशिवाय गुन्हे दाखल करणेदेखील चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, अॅट्रॉसिटीबाबत झालेल्या २०१० ते २०१६ च्या घटनांचा अभ्यास करुन त्यातील त्रुटी लक्षात घेत सुधारणा करण्याचे काम शिवसंग्राम करेल. तसेच कायद्यात आवश्यक बदल करण्याचा प्रयत्नही आम्ही करणार आहोत. दलितांच्या विरोधात आम्ही नाही. त्यामुळे मोर्चेक-यांचे म्हणणे, त्यांचा असंतोष समजून घेत सरकारने लक्ष द्यायला हवे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील याबाबत अभ्यास करुन सुधारणा कराव्या. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे आणि आण्णासाहेब पाटील महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करावी, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.
* पुणे मनपा निवडणूक शिवसंग्राम लढविणार
आगामी पुणे मनपा निवडणूक शिवसंग्राम लढविणार आहे. यामध्ये महायुतीमध्ये सहभागी व्हायचे की स्वतंत्रपणे लढायचे याबाबत निर्णय झालेला नाही, असेही मेटे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मला मंत्रीपद मिळाले नाही याबाबत नाराज आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत चालढकल केल्यास युतीतून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल. अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन पुढील महिन्यात करण्याचा प्रयत्न असून कामाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.