पुणे-“जम्मू आणि काश्मीरमध्ये ७० वर्षापासुन कलम ३७० लागू होतं. त्यामुळे त्या ठिकाणी दहशतवाद फोफावला. बेरोजगारी वाढली. महिला असुरक्षित होत्या. या सर्व घटनांना काँग्रेस जबाबदार आहे,” अशी टीका केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. काश्मीरातील जनतेला चांगले जीवन जगता यावे, यासाठी भाजपने कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावरून चुकीच्या चर्चा करीत, विरोधकांकडून भाजपाला लक्ष करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी, शरद पवार यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० असल्याचा देशाला काय फायदा आहे हे सांगावे,” असा प्रश्न त्यांनी केला.
पुण्यात वकिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद हे बोलत होते. यावेळी रविशंकर प्रसाद म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यामुळे तेथील जनता सन्मानाने जगत आहे. आता तेथील परिस्थिती पूर्ववत झाली असून, शाळा महाविद्यालय सुरू झाली. बाजारपेठ सुरू झाली आहे. ही चांगली बाब आहे. आता भविष्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये उद्योग व्यवसाय येतील. यातून तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल. इतर राज्यातील शैक्षणिक संस्था येणार आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे, शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“मागील पाच वर्षात महाराष्ट्रात भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले आहे. आजवर या राज्यात ज्या पक्षांनी सत्ता भोगली आहे. त्यांनी कधीच सर्वसामान्य जनतेचा विचार केला नाही. आम्ही सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
रामजन्म भूमीची केस जिंकणार –
देशातील अनेक भागात कार्यक्रमाला गेल्यावर तेथील कार्यकर्ते माझ्या राजकीय वाटचालीचा परिचय करून देतात. एक वकील असल्याने, आयुष्यभर अनेक केस जिंकल्या आहेत. त्यामध्ये देशभरात गाजलेल्या चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जेलमध्ये मी पाठवले. राम जन्मभूमीचा खटला कित्येक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होती. ती देखील केस मी जिंकली आहे. ही ओळख कोणत्याही माध्यमातून पुढे येताना दिसत नाही. हे देखील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे,” असे आवाहन प्रसाद यांनी केले.