पुणे :पानशेत पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडविण्यात भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये यश आले आहे. मुख्य म्हणजे पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरतो आहे, असे मत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील यांच्या प्रचारार्थ नुकतीच पूरग्रस्त वसाहत प्रभाग क्र 13 मध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेला भागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीने या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
पूरग्रस्त वसाहतीतील साई मंदिरात श्री. साईंचे दर्शन घेऊन श्री. पाटील यांनी या पदयात्रेस प्रारंभ केला. तर गणेशनगरमधील शनी-मारुती मंदिरात या पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेवेळी श्री दादांनी संपूर्ण परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.
ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. तर महिलांनी औक्षण करुन दादांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरीताई सहस्रबुद्धे, नगरसेवक दीपक पोटे आणि जयंत भावे आदी उपस्थित होते. या पदयात्रेमध्ये तरुणांसोबतच महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
गेल्या अनेक वर्षांपासून पानशेत पूरग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न श्री. पाटील यांनी केवळ दोन बैठकीत सोडवल्याने पानशेत पूरग्रस्तांकडून श्री. पाटील यांचे प्रभागात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत दादांना प्रभागातून मोठ्या मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही यावेळी पूरग्रस्त समितीचे मंगेश खराटे यांनी यावेळी दिली.