पुणे : तीन खासदार, आठ आमदार आणि शंभर नगरसेवक असूनही भाजपच्या नेत्यांना पाण्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही आणि पुण्याचा विकास साधता आलेला नाही, भाजपच्या नेत्यांनी विकासाच्या पोकळ गप्पा मारल्या, याला लोकं कंटाळली आहेत, अशी टीका कसबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी केली.कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघडीच्या समंजस आणि सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या भूमिकेला मतदार मतदान करतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
मतदार संघातील प्रतिष्ठीत व्यक्ती, प्रमुख कार्यकर्ते, संस्थांचे संचालक अशांच्या गाठीभेटी शिंदे यांनी शुकवारी दिवसभर घेतल्या, प्रचार आणि मतदान या विषयीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
गेल्या काही वर्षांपासून महानगर म्हणून पुणे आकाराला येत आहे.परन्तु पुण्याच्या विकासाला गती देण्यात भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक सपशेल अपयशी ठरले आहेत. शहरातील पेठांना अपुरा पाणी पुरवठा होतो आहे आणि त्याकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी चोवीस तास पाणी पुरविण्याच्या गप्पा मारत आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश झाला, नंतर अंमलबजावणी शून्य झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मेट्रोचे काम चालू झाले आणि अलिकडे ते कामही ढेपाळले. मेट्रो लवकर धावू लागेल अशा घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्या, अजून तरी मेट्रो धावलेली नाही. पुणे, नाशिक अशा शहरांची फसगत झाली आहे. बांधकाम क्षेत्र ठप्प आहे, कारखानदारी मंदावली आहे, महागाई वाढतेच आहे. सामान्य माणसाचे दैनंदिन जगणे अवघड झाले आहे आणि भाजपच्या मोठ्या घोषणा ऐकू येत आहेत आणि त्याला जनता कंटाळली आहे. राज्यकारभारात समंजसपणा दाखविणाऱ्या काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीकडे मतदार वळतील असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.
लोकायत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात पथनाट्ये सादर केली. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली महिला सहकार्यांनी घरोघर जावून प्रचार पत्रके वाटून मतदारांशी संवाद साधला.त्यामध्ये गीता तारू,भारती कोंडे,दुर्गा देशमुख,स्वाती शिंदे,शारदा वीर,फडतरे ताई,रोहिणी बल्लाव,मनीषा नेवसे,विमल जगताप आदी सहभागी झाल्या होत्या.