पुणे, : देशातील युवा शक्तीला संघटीत करुन योग्य प्रकारे शिक्षण देवून मनुष्यबळाचा विकास केल्यास देश जगातील प्रगत राष्ट्र बनून जगाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील एम.आय.टी कॅम्पसमध्ये पहिल्या नॅशनल टिसर्च कॉग्रेसच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. .यावेळी सिम्बॉयसिस संस्थेचे संस्थापक एस.बी. मुजुमदार, एम.आय.टी. चे संस्थापक वि.दा. कराड यांना जीवन गौरव पुरस्कार देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, विजय भटकर, एम.आय.टी.चे संस्थापक वि.दा. कराड, सिम्बॉयसिसचे संस्थापक एस.बी. मुजुमदार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की अध्यापन करण्याबरोबरच राष्ट्र व समाज निर्माणाचे काम शिक्षक करतात त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षकांना विशेष महत्व दिले आहे. आज आपल्या देशात सर्वात जास्त युवाशक्ती आहे. त्यांना चांगले शिक्षण देवून मनुष्यबळाचा विकास केला पहिजे. केवळ पदवी असून चालणार नाही तर गुणवत्ता असावी असे प्रतिपादन त्यांनी केले.
गेल्या 68 वर्षांमध्ये शिक्षणाचा विस्तार झाला. विद्यापीठे, महाविद्यालये, संस्था निर्माण झाल्या. सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले आहे. परंतु शिक्षणामध्ये गुणवत्ता निर्माण करणे हे प्रमुख आव्हान आहे. गुणवत्तेशिवाय मनुष्यबळाचा विकास होवू शकत नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व तज्ञांनी या परिषदेतून मंथन करुन, आलेल्या सूचनांची केंद्र व राज्य शासन स्तरावर अंमलबजावणीसाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान तंत्रज्ञानामार्फत पोहोचविता येते. परंतु ज्ञान देण्यासाठी शिक्षकाचीच आवश्यकता असते. चांगले चारित्र्यवान विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकाचे असते. शिक्षक हेच आदर्श असतात असे प्रतिपादन केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानात गेल्या दिड वर्षात 17 हजार शाळेच्या गुणवत्तेत वाढ झाली असल्याचेही मुख्यंमंत्र्यांनी या प्रसंगी सांगितले.