पुणे : “सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या काळात ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ग्राहकांना योग्य माहिती व सौजन्यपूर्ण वागणूक न मिळाल्यास ते इतरत्र जातात आणि त्यातून आणखी दहा संभाव्य ग्राहक दुरावण्याचा धोका असतो. त्यामुळे व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सातत्याने नवे ग्राहक आकर्षित करणे व जोडलेले ग्राहक टिकवून ठेवणे, याची कसोशीने काळजी घ्यावी,” असा सल्ला अल अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी काल येथे नवउद्योजकांना दिला.
‘मराठी युवा उद्योजक उद्योगिनी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’तर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘खासा २०१८’ या उद्योग प्रदर्शन-विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दातार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी टिळक स्मारक मंदिरात प्रसिद्ध निवेदिका सौ. उत्तरा मोने यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.
डॉ. दातार म्हणाले, “विक्रेत्यांची बाजारपेठ (सेलर्स मार्केट) आणि खरेदीदारांची बाजारपेठ (बायर्स मार्केट) असे दोन प्रकार आहेत. विक्रेत्यांचे नियम, शैली व मर्जीनुसार चालणारी बाजारपेठ सेलर्स मार्केट असते तर ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा ओळखून चालणारी बाजारपेठ बायर्स मार्केट असते. विकसित देश सध्या बायर्स मार्केट आहेत आणि उर्वरित जगाचा प्रवासही त्याच दिशेने सुरु आहे. व्यावसायिकाला यश आणि प्रसिद्धी त्याचे ग्राहक मिळवून देतात, हा माझा अनुभव आहे. मी व्यवसाय करताना नेहमी ‘डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर’ (संयम आणि सौजन्य) या तंत्राचा वापर केला. त्याचवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादने शुद्ध, स्वच्छ व सुरक्षित असतील याची काळजी घेतली. ग्राहकांना वस्तू हाताळायला व स्वतः निवडायला आवडतात, हे ओळखून साध्या दुकानांचे रुपांतर सुपर स्टोअर्समध्ये केले. दुबईतील एका छोट्या दुकानापासून सुरवात करुन आखाती देशांमध्ये ३९ सुपर स्टोअर्सची विस्तारण्यामागे संतुष्ट ग्राहक हेच कारण आहे.”
उद्यमशील तरुणाईला व्यवसायाचे महत्त्वपूर्ण कानमंत्र देताना ते म्हणाले, “कोणताही नवा व्यवसाय स्थिरावायला तीन वर्षे लागतात. तान्ह्या बाळाप्रमाणेच व्यवसायाचे संगोपन करावे लागते आणि नंतरही व्यवसायावर बारीक लक्ष ठेवावे लागते. नजर हटी तो दुर्घटना घटी, हे रस्त्यावरील इशारादर्शक वाक्य व्यवसायालाही लागू होते. सध्याचा काळ तीव्र स्पर्धेचा असल्याने मनात इर्ष्या ठेऊन व्यवसाय करावा. उलाढालीपेक्षा पदरात नफा किती पडतो, यावर श्रीमंती अवलंबून असते. त्यामुळे महत्त्व नफ्याला द्यावे. व्यवसाय ही कुठल्याही समाजाची मक्तेदारी नसते. देवाने प्रत्येकाला समान बुद्धी दिलेली आहे. त्याला कष्ट व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास कुणीही व्यवसायात प्रगती करु शकतो.”
ते पुढे म्हणाले, “व्यवसायात ‘जो दिखता है वो बिकता है’ हे तत्त्व म्हणजेच दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) फार महत्त्वाची असते. अगदी उद्योजकाचे व्यक्तीमत्त्व, व्यवसायस्थळाची रचना व सौंदर्य, उत्पादनाची मांडणी व पॅकेजिंग, प्रसिद्धी या सगळ्यात त्याचे प्रतिबिंब पडते. म्हणून उद्योजकांनी केवळ उत्पादनांचेच नव्हे तर आपल्या व्यवसायाचे व स्वतःचेही ब्रँडिंग करावे. परिवर्तन संसार का नियम है या वचनानुसार कालसुसंगत बदल घडवावेत. व्यवसायात समस्या येतात आणि त्यातील केवळ पाच टक्के समस्या शांत राहून आपोआप सुटतात. उर्वरित ९५ टक्के समस्या आपल्याला तटवाव्या लागतात. समस्यांना घाबरु नये. उलट आपण समस्येपेक्षा मोठे व्हावे. कोणत्याही स्थितीत व्यवसायातून पाय मागे घेणार नाही, ही जिद्द बाळगावी, सर्वांत महत्त्वाचे आरोग्याकडे दुर्लक्ष करुन निव्वळ पैशाच्या मागे लागू नये. घाम गाळून मिळवलेला पैशाचा कुटुंबासमवेत आनंद घ्यावा.”
मुलाखतीदरम्यान डॉ. दातार यांनी आजवरचा आपला संघर्षमय प्रवास उलगडून सांगितला. बालपणातील गरिबीचे दिवस, तरुण वयात दारोदार फिरुन घेतलेला विक्रीकलेचा अनुभव, व्यवसायात पहिल्याच वर्षी झालेले प्रचंड नुकसान, ते भरुन काढण्यासाठी आईने मंगळसूत्र विकून जागवलेला निर्धार, दुबईतील कष्टमय वाटचाल, इराक-कुवेत युद्धादरम्यान उद्भवलेले धंदा बुडण्याचे संकट, व्यवसायातील प्रगतीसाठी पत्नीची झालेली अनमोल मदत असे अनुभव विशद केले.
‘मराठी युवा उद्योजक उद्योगिनी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’चे सुनील दातार यांनी धनंजय दातार यांचे तर आशिष संकपाळ यांनी सौ. वंदना दातार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमात मराठी चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांचे, तसेच डॉ. सुनील काळे यांचे यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमात डॉ. अंजली चौगुले (मॉडेलिंग), मनाली पाळंदे (पाळंदे टेक सोल्यूशन्स), मिलिंद आपटे (चित्रकार), नितीन ढेपे (पर्यटन), नवनाथ येवले (येवले अमृततुल्य) या पाच उद्योजकांना यशस्वी मराठी उद्योजकता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. योगिता बडवे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
पुण्याच्या आत्मीय आठवणी
पुणे शहराबाबतच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना डॉ. दातार म्हणाले, “सन १९९६ मध्ये मी कराडवरुन मुंबईला येत असताना शिरवळजवळ माझ्या कारला एका ट्रकने जबरदस्त धडक दिली होती. त्या अपघातात मी, माझी पत्नी व चालक बेशुद्ध झालो तर माझा एक वर्षाचा मुलगा दुखापत होऊन रडत होता. आम्ही सर्वजण दरवाजे लॉक झाल्याने गाडीत अडकलो होतो आणि गाडीने बाहेरुन पेट घेतला होता. त्यावेळी पुण्यातील एक मारवाडी सद्गृहस्थ तेथून चालले होते. त्यांनी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून तातडीने धाव घेतली व काचा फोडून आम्हाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. बरा झाल्यावर मी माझी अपघातग्रस्त कार पुण्यातील गॅरेजमध्ये दुरुस्तीला टाकली. त्यानंतर विमा भरपाईच्या पूर्ततेसाठी मला सतत मुंबईहून पुण्याला यावे लागायचे. पुण्यात उत्तम आणि रुचकर खाद्यपदार्थ मिळत असल्याने मी या फेऱ्यांत अशा पदार्थांचा मनापासून आस्वाद घ्यायचो.”