सातारा- साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या पक्ष प्रवेशावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. पण अखेर आज (2 सप्टेंबर) त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझ्या अटींवर मी प्रवेश करेन. मी काय करावं हे कोणी दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. मला जे करायचय ते मीच ठरवणार.” असे उदयनराजे म्हणाले. दरम्यान, उदयनराजेंनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीने खासदार अमोल कोल्हेंना त्यांची मनधरणी करण्यासाठी पाठवले असल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाले उदयनराजे?
“मी माझ्या अटींवर प्रवेश करेन. मी काय करावं हे कोणी दुसरे सांगू शकत नाही. मला काय करायचय ते मीच ठरवणार. मला शोभेल असे आणि लोक हिताच्या अटी मान्य झाल्यास मी माझा निर्णय घेईन. उद्योग बंद पडत आहेत. त्यांना पुन्हा कसं सुरू करता येईल, यावर विचार करावा लागेल. अन्यथा भारतावर दिवाळखोरीची वेळ येईल. आपण पैसे कुठून आणणार? आपण पैशाचे नाटक करू शकत नाहीत. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यांनी ठरवावं आणि मला सांगावं. जायचं असेल तर हो, नसेल तर नाही.”
मुख्यमंत्र्यांना विचार करायला सांगितला आहे
माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. फडणवीस मुख्यमंत्री नव्हते आणि आमदारही नव्हते तेव्हापासून माझे मित्र आहेत. मी त्यांना व्यवस्थित विचार करायला सांगितला आहे.