(एकीकडे सर्वत्र पाकिस्तानला धडा शिकवाच अशी मागणी होताना दिसत असताना ,युद्ध नको …अशी मागणी करणारे पत्र पुण्यातील लेखक संजय सोनवणी यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे ,ते -येथे जसेच्या तसे देत आहोत ..)
मा. श्री. नरेंद्र मोदीजी,
आदरणीय पंतप्रधान भारत सरकार
नवी दिल्ली
स.न.वि.वि.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, जम्मू काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी कृत्यानंतर या दहशतवादी घटनेमागे असलेल्या अतिरेकी शक्तींना धडा शिकवणे आवश्यक होते. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करुन आपल्या हवाई दलाने चोख कामगिरीही बजावली. म्हणूनच याचे नेतृत्व करणाऱ्या आपले मनपूर्वक अभिनंदन. मात्र त्यानंतर दोन्ही बाजुंच्या युद्धज्वराने पछाडलेल्या काही गटांनी जे वातावरण निर्माण केले त्यामुळे मला जी काळजी वाटते आणि इतिहासाचा अभ्यासक म्हणून जे वाटते ते आपणासमोर नम्रपणे मांडत आहे. त्यानंतर इम्रानखान यांच्या प्रस्तावानंतर मला ही आपणासाठी ऐतिहासिक संधी आहे असे वाटते. अशा स्थितीत नियतीने आपल्याला दिलेल्या ऐतिहासिक संधीचा लाभ घेत आपण
दूरगामी मुत्सद्दीपणाचे निर्णय घेत तसे धोरण राबवत या युद्धज्वराला विराम देत, सैनिक व नागरीकांचे जीवित/वित्त सुरक्षित ठेवत देशाचा गरिमाही उंचावू शकता. आज कदाचित माझे हे म्हणणे आपणास आवडणार नाही मात्र मी मनातील भावना व्यक्त केली नाही तर इतिहास मला माफ करणार नाही असे वाटल्याने हे धाडस दाखवत आहे.
मा. महोदय, आपल्या भारतभुमीची खरी ओळख बुद्ध-महावीराचा आणि गांधीजींचा देश अशी आहे. “सबलांचा अहिंसावाद” हे गांधीजींच्या तत्वज्ञानाचे मुलभूत सार आहे आणि आपणही दहशतवादाला खरे उत्तर गांधीजींचेतत्वज्ञानच आहे असे एका कार्यक्रमात जाहीरपणे म्हटल्याचे स्मरते. आपणही गांधीजींच्या भूमीतून आलेले आहात. आपण जगात जेथे जेथे गेलात त्यावेळीस भारताच्या या प्रतीकासमोर नतमस्तक झाला आहात. भारत आज सबळ आहे आणि तो भविष्यात अजून जास्त प्रबळ बनत महासत्ता बनेल अशी स्वप्ने देशवासी पहात आहेत. हे स्वप्न सातत्याने युद्धसदृष्य वातावरण निर्माण करत निर्माणाऐवजी विध्वंसाची भाषा करत राहिल्याने पुर्ण होऊ शकणार नाही हे आपणही जाणता. बुद्ध-गांधीजींच्या मार्गानेच हे साध्य होऊ शकणारआहे यात शंका नसावी.
आपण सरदार पटेलांचा अभिमान वाटेल असा गगनचुंबी पुतळा स्थापित केला, पण अनाहुतपणे बुद्ध आणि गांधीजींची प्रतिमा छोटी झाली. हे आपल्या लक्षातही आले नसावे. चीनने यासाठी दिलेले योगदानही आम्ही मोठ्या आनंदाने स्वीकारले. सरदार पटेल हे गांधीजींच्याच तत्वज्ञानाचे पाईक होते आणि संस्थाने विलीन करण्यासाठी त्यांनी जे जे मार्ग वापरले ते गांधीजींच्याच अनुमतीने हे बहुधा देश विसरला. शत्रुबाबत अहिंसेचे धोरण चालत नाही हे गांधीजींना माहित होते, पण त्याआधी शांततेचे सर्व प्रयत्न, प्रसंगी नुकसान सोसुनही, करणे ही पुर्वअट होती हे मात्र आपण विसरत असतो. त्यामुळेच काश्मिरमध्ये जेंव्हा टोळीवाले शिरले तेंव्हा सैन्य पाठवायची अनुमती देणारे गांधीजीच होते. शांततेचे सर्व मार्ग खुंटल्यानंतरच आपली शक्ती दाखवून देणे आणि थांबत पुन्हा कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्वाचे आहे.
पाकिस्तानला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. आता मात्र पुढे जाताना भारताच्या इतिहासाकडे आपण जरूर डोकावून पाहायला हवे. सिकंदराबद्दल तर एक गाणे प्रसिद्ध आहे “वो सिकंदर भी क्या था जिसके होसले तो भारी थे, जब गया इस दुनियासे दोनो हाथ खाली थे”
आपणास नुकताच जागतीक शांतता पुरस्कार मिळाला आहे. या युद्धायमान स्थितीत आपण बुद्धाला आणि गांधीजींना आदर्शभूत मानत योग्य पावले उचलत नुसती भारतीय उपखंडातच नव्हे तर जागतीक शांतीसाठी, मानवतेच्या रक्षणासाठी फार मोठी भुमिका निभावू शकता. आपणास जागतीक नेतृत्व करण्याची संधी यानिमित्ताने आली आहे. दहा हजार वर्षांची सांस्कृतीक परंपरा असलेल्या या महान संस्कृतीचे सुपूत्र म्हणून आपण ही जबाबदारी कशी पार पाडता याकडे सारे जग आपल्याकडे डोळे लावून बसले आहे. आपण ती जबाबदारी युद्धज्वराला प्रोत्साहन देवून पार पाडता की शांततेला सर्वोपरी मानत पार पाडता यावर इतिहासातील आपले स्थान अवलंबून असणार आहे. सम्राट अशोकालाही कलिंग युद्द्धातील अपार हिंसेनंतर शेवटी बुद्धाकडेच वळावे लागले. आपण त्यापासून धडा घेत जर आधीच बुद्धमार्ग धरला तर ते जास्त अभिमानास्पद राहील आणि महावीर, बुद्ध आणि गांधीच्या परंपरेत जग आपली आठवण ठेवेल.
अन्यथा क्रियेची प्रतिक्रिया या न्यायाने हे एकमेकांवर होणारे हल्ले सातत्याने चालू राहतील आणि देशाची शक्ती घटत राहील. फुटीरतावादी शक्ती याचा अजुनच गैरफायदा घेतील आणि देश अजुनच पोखरला जाईल. दहशतवादी मनोवृत्ती असलेल्यांना उलट यातून प्रोत्साहनच मिळेल. हे थांबवण्यासाठी सबलांनीच कोठे थांबायचे हे समजावून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी प्रथम आमच्या देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय प्रवाहात एकदिलाने आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही भागातील नागरिकांना हे राष्ट्र माझ्यासाठी आणि माझे आहे ही हार्दिक भावना निर्माण करावी लागेल. त्याशिवाय शत्रुची खरी आणि कायमस्वरुपी हार झाली आहे असे मानता येणार नाही. हा बुद्ध -गांधीजींचा मार्ग होय. आणि तोच शेवटी भारताला उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतो आणि त्याचे नेतृत्व आपणच करावे आणि भावी काळातील सर्व सत्तांसाठी आणि जगासाठी एक आदर्श मार्ग घालून द्यावा व त्यासाठी जागतीक सत्तांनाही सोबत घ्यावे अशी आपणाकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा पुर्ण झाली तर भारताची ओळख जगात उद्या श्री. नरेंद्र मोदींचा देश अशी होऊ शकेल.
महाराष्ट्रातीलच एका आमदाराने अलीकडे आपल्या भक्तीपोटी आपल्याला विष्णुचे अवतार संबोधले होते. त्यात अंधश्रद्धा, अतिशयोक्ती आणि भाबडेपणा असला तरी भारतातील एक वर्ग आपल्याकडे अवताराच्याच दृष्टीने पाहतो हे वास्तव नाकारता येत नाही. बुद्धानंतरचा हा अवतार बुद्धाच्याच मार्गाला शिखरावर नेईल अशी आपल्या भक्तांचीही अपेक्षा आहे. आपण त्यांना तरी निराश करणार नाही याचीही आशा आहे.
पुलवामातील जवानांच्या हत्यांबद्दल प्रत्येक नागरिकाचे हृदय उद्रेकत आहे. त्या शोकाने काळीज पिळवटते आहे. विंग कमांडर अभिनंदन यांचीही चिंता सतावते आहे. पण हीच वेळ शांतपणे विचार करुन भावी दिशा ठरवण्याचीही आहे. युद्धखोर सत्ता जगाच्या इतिहासात काय स्थान प्राप्त करुन बसल्या आहेत हे आपणास माहितच आहेच. आम्हाला आमच्या देशाची प्रतिमा नकळतपणे “युद्धखोर देश” अशी होऊ नये तर सर्वार्थाने सबळ असलेला शांततेचा पाईक असलेला देश अशी ही अपेक्षा आहे. माझी आपणास हा सल्ला देण्याची योग्यता नाही आणि सध्या आपलीही ऐकण्याची वेळ नाही याची जाणीव असुनही इतिहासाचा अभ्यासक म्हणून ही विनंती करीत आहे. पत्र मराठीत आहे मात्र आपण महाराष्ट्रावर प्रेम करता आणि आपली प्रेरणाभूमी महाराष्ट्र असल्याचे आपण नेहमीच सांगत असता म्हणूनच आपण जरूर विचार कराल ही भाबडी आशा.
आपला,
संजय सोनवणी
पुणे.
Sanjay Sonawani
9860991205