दिल्ली – माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. सुषमा स्वराज यांचे पार्थिव शरीर लोधी रोड येथील स्मशानभूमीवर आणण्यात आले. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर सुषमा यांचे पार्थिव शरीर दुपारी भाजप मुख्यालयात आणण्यात आले. येथूनच सुषमा यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली होती. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि इतर पक्षांचे नेते तसेच अनेक मान्यवर उपस्थितहोते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी सुषमा स्वराज यांच्या जंतर-मंतर येथील निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींनी यावेळी सुषमा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि भावूक झाले. सुषमा यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या इतर मान्यवरांमध्ये योग गुरू बाबा रामदेव, हेमा मालिनी, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चांडी, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, बसप प्रमुख मायावती, कैलाश सत्यार्थी, अनुराग ठाकूर यांचाही समावेश होता.
वयाच्या 25 व्य वर्षी मिळाले होते मंत्रिपद, पहिल्या महिला विरोधीपक्ष नेत्या
1977 मध्ये कॅबिनेट मंत्री झाल्या त्यावेळी त्यांचे वय फक्त 25 वर्षे होते. त्या देशातील सर्वात युवा महिला कॅबिनेट मंत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री पद भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या सुषमा स्वराज पहिल्याच महिला होत्या. भाजप सरकारमध्ये प्रथमच महिलेला मंत्री करण्यात आले, त्या देखील सुषमाच होत्या. 2009 मध्ये प्रथमच सुषमा स्वराज यांच्या नावे देशाला पहिल्या महिला विरोधीपक्ष नेत्या मिळाल्या होत्या.