एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. आघाडीचे लेखक गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी या चित्रपटातील कलाकार सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे उपस्थित होते. अभिनेते महेश मांजरेकर यांची सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘टेक केअर गुड नाईट’चा ट्रेलर सुद्धा यावेळी दाखविण्यात आला.
या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.
लेखक गिरीश जोशी म्हणतात की, या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले,” ते म्हणतात.
जरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला.”
मेकॅनीकल इंजीनीयरिंगचा विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला असतानाच गिरीश यांच्या ध्यानात आले की, आपण वर्गापेक्षा रंगमंचावर अधिक काळ घालवला आहे. रंगमंचावरील स्पर्धेत आपल्याला मशीनच्या थीयरीपेक्षा अधिक मजा येते, असेही त्यांना मनोमन जाणवले होते. त्याचवेळी त्यांनी कॉलेजला रामराम ठोकायचे ठरवले आणि पुढील काही वर्षे मग त्यांनी रंगमंचावर घालवली. रंगमंचावर विविध भूमिका बजावल्या आणि आपले कलेचे अंग अधिक सक्षम केले. लेखक,दिग्दर्शक, अभिनेता आणि अगदी सेट डिझायनर आणि लाईट डिझायनर अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी पन्नासहूनही अधिक नाटकांमध्ये कामे केली. जसजशी संधी मिळाली तसतसा आकार घेत स्वतःचे नाव निर्माण केले. पुढे नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही क्षेत्रांत आपला वावर त्यांनी प्रस्थापित केला. पुणे येथील ‘मीडिया स्कूल’मध्ये त्यांनी ‘स्क्रीनप्ले अंड स्ट्क्चर’ हा विषय तीन वर्षे शिकवला. त्यांनी विविध टीव्ही मालिकांचे ५०० हूनही अधिक भाग लिहिले आणि त्यानंतर ते चित्रपट लेखनाकडे वळले.
या चित्रपटाची प्रस्तुती करत असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो,हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई – २, बापजन्म आणि आम्ही दोघी या काही चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती कंपनीने केली आहे.