पुणे – मी राज्यकर्ता असतो तर पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्त्यांवर खटले दाखल करणाऱ्या पोलिस आयुक्तांना प्रथम निलंबित केले असते. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज भाजप सरकारवर खरमरीत टिका केली. यावेळी सत्तेचा गैरवापर करणाऱ्या राज्यकर्त्यांना हटविण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने शिवगौरव शिवसन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासकार मा.म.देशमुख आणि माजी न्यायमुर्ती बी.जी कोळसे पाटील यांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे, ज्येष्ठ अभिनेते शंतनू मोघे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांना शिवसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
घटनेने प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे, विचार पडत नसतील तर त्याचे उत्तर विचारांनी दिले पाहिजे पण सध्या मत मांडण्याचा अधिकार राहीलेला नाही. वेगळे विचार मांडणाऱ्यांना डांबून ठेवले जात आहे. त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. हे योग्य नाही. आपल्याकडे सर्वोच्य न्यायालय अजून जिवंत असल्याने थोडे फार बरे आहे तरी सुध्दा अशा वक्त्यांना कुठल्याही दुसऱ्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार चालणार नाहीत. आम्हाला म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये त्यामुळे या राज्यकर्त्यांना उलथवून टाकण्यासाठी आता सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे ही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुरस्कार्थीमध्ये बी.जी कोळसेपाटील, मा.मू.देशमुख, प्रताप गंगावणे, शंतनू मोघे, दादा पासलकर यांची सुद्धा भाषणे झाली. याशिवाय शिवजयंतीच्या निमित्ताने आयिोजत केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना सुद्धा यावेळी पारितोषिके देण्यात आली.